अमरावती – राज्यात सध्या अनेक नेत्यांच्या विरोधात ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईवरून भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तू तू मै मै होताना दिसत आहे. आता या कारवाईबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली. ते अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात ही भाजपची सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. तर भाजप यामध्ये आमचा काहीही संबंध नसल्याचे म्हणत आहे. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, ” देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केले आहे . उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही, मलाही ईडीची नोटीस दिली होती ‘गां XX दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी’ असे थेट आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सध्या निवडणुकांवरून होत असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली. आंबेडकर म्हणाले, ” सभागृहाचा कालखंड हा पाच वर्षाचा आहे. तो संपण्याअगोदर नवीन सदस्यांचे गठीत होणे गरजेचे आहे. ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. विधानसभा आणि लोकसभा ही केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने निवडणुका योग्य वेळी घेतल्या नाहीत. त्यानंतर दाखल झालेल्या याचिकेबाबत कोर्टाने देखील संविधानाला धरुन निर्णय दिला नसल्याचे आंबेडकर म्हणाले.
सभागृह अस्तित्वात नसताना टॅक्स गोळा करण्याचा प्रशासकाला अधिकार आहे का? हा प्रश्न कोर्टाला विचारला असता तर कोर्टाने टॅक्स भरू नका असाच निर्णय दिला असता असे ते म्हणाले. टॅक्स लावण्याचा अधिकार हा प्रशासकाला नाही तर निवडून गेलेल्या सभागृहाला असल्याचे आंबेडकर म्हणाले.