पंढरपूर- आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास करण्यात आली असून पंढरपुरात जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाले आहेत.
देवाचे मुख दर्शन सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. माघी वारीला चंद्रभागा स्नानाला महत्व आहे. त्यादृष्टीने चंद्रभागा नदीपात्रात बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच एकादशी निमित्त पुण्यातील भाविक सचिन अण्णा चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी फुलांची आरास केली. झेंडू, शेवंती, जरबेरा आदी १ टन फुलांची आरास करण्यात आली. या फुलांच्या सजावटीने देवाचे रूप अधिकच खुलून दिसून आले. एकादशी निमित्त भाविकांनी चंद्रभागा स्नान ,नगरप्रदक्षिणा करून देवाचे दर्शन घेतले. शहरातील धर्मशाळा ,मठ , मंदिर परिसर येथे भाविकांची गर्दी टाळ मृदूंग व हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वारीला प्रशासनाने आरोग्यविषयक सोयी सुविधांसह व्यवस्था केली आहे. मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, फराळ तसेच आरोग्य सेवा मोफत पुरविल्या आहेत. त्याचबरोबर दर्शन रांगेतील भाविकांनी मास्क, सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. एकादशी निमित्त हरी विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी तर रुक्मिणीमातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक झाली.