मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आला असून. बांधकाम नियमिततेची योग्य कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. 15 दिवसानंतर योग्य कागदपत्रे सादर न झाल्यास महापालिका कारवाई करणार, असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेने जुहूतील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करत 351(1)ची नोटीस दिली आहे. बंगल्यात केलेले बदल मंजूर केलेल्या प्लॅननुसार असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले होते. यानुसार राणे यांनी सर्व कागदपत्रे पालिकेला दाखवली. परंतु पालिकेचे समाधान झाले नाही. 21 फेब्रुवारी पालिकेच्या के पश्चिम विभागाने बंगल्यात जाऊन तपासणी केली होती. सर्वच मजल्यांवर चेंज ऑफ यूझ झाले असून बहुतांश ठिकाणी गार्डनच्या जागी रूम बांधल्याचा नोटीसीत उल्लेख आहे.
सीआरझेड 2 मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती पालिकेला सादर केली नाही. सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अंतर्गत वाढीव बांधकामाचा उल्लेख नसल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. अग्निशन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेटसह वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी योग्य कागदपत्रे पुरावे जोडलेले नाहीत असे पालिकेने म्हटले आहे.
दरम्यान, राणेंनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने राणेंना दिलासा देत याचिका निकाली काढली. त्यामुळे बीएमसीनेही नोटीस मागे घेतली होती. पण या प्रकरणीच याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.