जम्मू- जम्मू काश्मीरमध्ये आज भारतीय सुरक्षादलाने वचनपूर्ती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (दि. १२) राहुल भट्ट या काश्मिरी पंडित युवकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेचा बदला घेऊन भारतीय सुरक्षादलाने २४ तासांच्या आत राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना यमसदनी धाडले. या कारवाईने भट्ट यांच्या पत्नीला दिलेल्या वचनाची पूर्ती सुरक्षा दलाच्या जवानांनी केली.
भारतीय सुरक्षा दलाने शुक्रवारी संध्याकाळी बांदीपोरामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यामध्ये मारले गेलेले दोन दहशतवादी राहुल भट्टच्या हत्येत सामील होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी त्यांची पत्नी मीनाक्षी यांना दोन दिवसांत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आश्वासन दिले होते. लष्कराने 24 तासांत आपले वचन पूर्ण केले .
अशी झाली होती राहुल भट्ट यांची हत्या
राहुल भट्ट हे जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील चदूरा येथील तहसील कार्यालयात नोकरीला होते. राहुल भट्ट हे बडगाम डीसी कार्यालयात कामाला होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची चदूरा येथील तहसील कार्यालयात बदली झाली. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल भट्ट सातत्याने बदली करण्याची मागणी करत होते. पण त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यानंतर दोन शिक्षकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर राहुल भट्ट यांनी आपली मागणी लावून धरली. पण त्याला यश आले नाही. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात काम करत असताना दहशतवादी कार्यालयात घुसले आणि त्यांनी राहुल भट्ट यांच्यावर गोळीबार केला. जखमी अवस्थेत त्यांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.