‘तुम्ही हनुमान चालीसा लावा…. ‘; किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

223 0

मुंबई- राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालीसा लावायला सांगतील आणि स्वतः फिरायला जातील अशी खोचक टिपण्णी केली आहे.

मशिदींसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. मी जरा फिरून येतो. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावल्यानंतर काही भांडण आणि तंटे झाले तर तुम्ही तुमचं बघून घ्या, अशी राज ठाकरे यांची भूमिका असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या आदेशामुळे तरुण मनसैनिक तुरुंगात जाऊन बसतील. तुम्ही तुमचं रेकॉर्ड बिघडवाल. मात्र, राज ठाकरे हे सगळं तुम्हीच भोगा, असे म्हणतील. पण मनसैनिकही हुशार झाले आहेत. हे सगळे खरे नाही. भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे, हे त्यांनाही माहिती आहे, असेही पेडणकेर यांनी म्हटले. त्या सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, हनुमान चालिसाचा आधार घेऊन काही भेसूर चेहरे महाराष्ट्र, मुंबईला तोडू पाहत आहेत. ठरवून गेम करण्याचं राजकारण सुरु आहे. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. नागरिकांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मुंबईत दंगली नकोत, ही ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे. शिवसैनिकांना डोकी थंड ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या भाषणावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. ते मातोश्रीत होते. मागच्या वेळी भावावर बोलल्यानं बॅकफुटवर जावं लागलं. म्हणून आता पवारसाहेबांवर बोलले. असं पेडणकर म्हणाल्या.

बाबरी मशिदीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, बाबरीचा घुमट पडल्यानंतर पळता भुई थोडी झाली. तेव्हा कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. जेव्हा बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं, की बाबरी शिवसैनिकांनी पाडली तेव्हा हे कुठे होते? त्यावेळी तुम्ही का गप्प बसलात, असा सवाही पेडणेकरांनी केला.
मी स्वत: २७ महिलांसह अयोध्येला जाण्यासाठी कल्याणमध्ये गाडीत बसले होते. मात्र, महिलांना यायचे नाही, असे सांगत आम्हाला गाडीतून उतरवण्यात आले. त्यामुळे मी बाबरी पतनावेळी अयोध्येला गेले होते, असे खोटे सांगणार नाही. देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे मी नाकारत नाही. पण त्यांच्यासोबत शिवसैनिकही तुरुंगात होते, ही बाब त्यांनी स्वीकारली पाहिजे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!