मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते सध्या या पोलिसांच्या कोठडीतून त्या पोलिसांच्या कोठडीत फिरत आहेत. शरद पवारांच्या घरावरील हिंसक आंदोलन प्रकरणी सदावर्तेंना जामीन मिळूनही ते अद्याप जेलमध्येच आहेत. कारण अद्याप त्यांनी जामीनाच्या अटीशर्तींची पूर्ताता केलेली नाही. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलताना मराठा समाजाबद्दल सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून पुण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करणं, दोन समाजात तेढ निर्माण करणं या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुण्याच्या विद्यापीठ पोलिसांनी कालच आर्थर रोड जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याविरोधात सदावर्ते यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सदावर्तेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अटकेपासून सदावर्तेना दिलासा
मराठा आंदोलनावेळी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत मुंबई पोलिसानंतर सातारा पोलिसांनी गुणरत्न सादावर्ते यांचा ताबा घेतला. त्यानंतर सातारा कोर्टानेही काही दिवस त्यांची कोठडीत रवानगी केली. मात्र तोपर्यंत सदावर्ते यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. साताऱ्यानंतर सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवस त्यांचा मुक्काम कोठडीत राहिला. आणि कोल्हापुरात थोड्या अडचणी कमी झाल्या असे वाटत असतानाच गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा पुणे पोलीस घेणार होते. मात्र आजच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सदावर्ते यांना पुण्याच्या प्रकरणातून अटक होणार नाही. मात्र इतर प्रकरणात ते कोठडीत असतील. त्या प्रकरणांमधून त्यांना जामीन मिळणार नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्येच राहावं लागणार आहे.