मुंबई- एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडखोरीने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर काळे ढग जमा झालेले आहेत. या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज बोलावण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीला हजर राहा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही तासांमध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतर आमदार परत येण्याऐवजी आता शिवसेनेत असलेले आणखी आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतील वर्षा बंगल्यावर आज बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे.
शिवसेनेचे पाटणचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय की, पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आणि राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज म्हणजेच, बुधवार 22 जून, 2022 रोजी, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.
या बैठकीला उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे, असे ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावर आता एकनाथ शिंदे गटातील आमदार काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
दरम्यान, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे. एकनाथ शिंदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
निष्ठेच्या अग्नीपरीक्षेत कोण उत्तीर्ण होतंय, हे लवकरच समजेल
जोपर्यंत शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येत नाहीत तोपर्यंत मत व्यक्त करता येणार नाही. या सगळ्या प्रकरणातून शिवसेना तावुनसुलाखून बाहेर पडेल. निष्ठेच्या अग्नीपरीक्षेत किती जण उत्तीर्ण होतात, हे भविष्यात समजेल, असे संजय राऊत यांनी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मत व्यक्त केले.