मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह खात्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा परामर्श घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाचा आढावा घेणारा अहवाल देखील तयार करण्यात येईल. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. दरम्यान, वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, भोंग्याचा निर्णय हा काही राज ठाकरे यांनी घ्यायचा नाही. यावेळी वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून समाजामध्ये द्वेष निर्माण होईल. भावना भडकवल्या जातील असा प्रयत्न केल्याची टीका वळसे पाटील यांनी केली.
मशिदींवरील भोंग्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला ३ तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील भोंगे बंद झाले नाहीत तर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत भाषण केल्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय उद्या ईद आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आजच संध्याकाळी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यातील संवेदनशील भागांचा आढावा घेणार आहेत. धोक्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा कशाप्रकारे सामना करायचा, कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 अटी-शर्तींवर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती. या अटी-शर्तींचं पालन मनसेच्या सभेत झालं की नाही याची पडताळणी देखील पोलीस करणार आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य केलं का किंवा त्यांच्या संपूर्ण भाषणाचा आढावा घेणारा अहवाल देखील तयार करण्यात येईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करतील. त्याअनुषंगाने गृहखात्याची पुढील रणनीती असणार,
‘पोलिसांनी भाषण ऐकल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल’
भोंग्याबाबतचा निर्णय हा काही राज ठाकरे यांनी घ्यायचा नाही. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका करून, समाजामध्ये कशाप्रकारे भावना भडकतील याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद पोलीस राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण ऐकून त्याचा अहवाल तयार करतील त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
शरद पवार यांच्यावरील टीकेला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, शरद पवार यांच्यावर आरोप केल्याने काही परिणाम होईल असे नाही. पवार साहेबांचे राजकीय आणि सामाजिक जीवन प्रत्येकाला माहित आहे. त्यांनी नेहमी विकासाचे काम केले आहे. समाजाला एकत्र ठेवण्याचे, उभे करण्याचे काम केले आहे. शरद पवारांच्या हजारो निर्णयामुळे महाराष्ट्राला आजची समृद्धी मिळाली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सांगण्याला काहीच कार्यक्रम नाही ते असे आरोप करतात, असे वळसे पाटील म्हणाले.