सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अजित पवारांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या आहेत.बीडमधील वाढती गुन्हेगारी निदर्शनाश आणून देण्यासाठी त्या अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. तर त्या धनंजय मुंडेंविरोधात काही पुरावे दादांसमोर मांडणार असल्याची देखील माहिती आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, संतापाची लाट आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानं वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते.
दमानिया यांनी आधीच ट्विट केलं होतं की, मी जेव्हा त्याचा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्याला काहीही झालं नसल्याचं दिसून आलं तो ठणठणीत बरा आहे. मग त्याची केवळ बडदास्त ठेवण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं का? त्याच्यामुळे आकरा रुग्णांना आपले बेड खाली करावे लागले. या प्रकरणात त्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांनी संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम अहवालावर देखील संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल योग्य दिला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान अजंली दमानिया यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. अजित पवार यांनी आता दमानिया यांना भेटीसाठी वेळ दिला. आणि आता त्यांच्यात चर्चा होणार आहे. भेटींनंतर त्या काय बोलणार हे पाहणं महत्वाचं राहील.