मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होणाच्या शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. मुंबईतील वसंत स्मृती सभागृहात आज भाजपाच्या ओबीसी मोर्चातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या परिस्थितीमध्ये ओबीसी कार्यकारणीची बैठक होत आहे ती अत्यंत दुःखद आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. अशा प्रकारची अवस्था असताना ही कार्यकारणीची बैठक होत आहे. ओबीसींचे आरक्षण हे गेले नसून त्याचा मुडदा पाडलेला आहे. राजकीय आरक्षणाचा खून महाविकास आघाडीने केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सत्तेत आल्यापासून यांना इम्पेरिकल डेटा देखील गोळा करता आला नाही. कोर्टानं वारंवार झापूनही यांच्यातला कोणतरी एक जण उठतो आणि केंद्राची जबाबदारी आहे सांगत सुटतो. अरे मग तुम्ही सरकारमध्ये कशाला आहात? द्या ना मग केंद्राच्या हाती. केंद्र सरकार चालवेल आणि करुनही दाखवेल”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. तुम्हाला काय माशा मारण्यासाठी निवडून दिलंय का ? माल कमावण्यासाठी की वसुलीसाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय?”, असा थेट सवाल फडणवीसांनी केला.
“महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये ओबीसी नेते आहेत. पण आघाडीतील पक्षांचे जे मालक आहेत, त्यांना ओबीसींचं हित हवंय, असं वाटत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची रचना बघितली, तर कार्यक्रमात फ्लॉवरपॉट असतो, तसा एक ओबीसी नेता तयार करतात. त्याच्या भरवशावर मग ते आपली दुकानदारी चालवतात. मग एखादाच नेता मोठा होतो. कारण त्या मालकांचं राजकारण ओबीसीच्या भरवशावर नाही, तर त्यांच्या वापरावर चाललेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे मालक कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत,”
“ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा शेवटपर्यंत सुरु ठेवणार आहोत. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भाजपा ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. तो पर्यंत २७ टक्के तिकिटे आम्ही ओबीसींना देणार हा भाजपाचा निर्धार आहे. भाजपा हा पक्ष ओबीसींच्या विश्वासावर मोठा झाला आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.