काँग्रेस नेत्या व खासदार वर्षा गायकवाड (VARSHA GAIKWAD)यांनी संसदेतील कामकाजात पक्षपात होत असल्याचा आरोप करत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबे (NISHIKANT DUBE) यांना पूर्ण वेळ बोलण्याची संधी दिली जाते; मात्र राहुल गांधी देशाची सुरक्षा किंवा चीनच्या घुसखोरीसारख्या गंभीर विषयांवर बोलू लागले की त्यांचा माईक बंद केला जातो किंवा अडथळे निर्माण केले जातात, असे गायकवाड म्हणाल्या. निष्पक्षतेची अपेक्षा असताना प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी गायकवाड यांनी निशिकांत दुबे (NISHIKANT DUBE) यांच्या महिलांविषयीच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचाही मुद्दा उपस्थित केला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानांमधून त्यांच्या वक्तव्यातील द्वेष स्पष्ट होतो, असा आरोप त्यांनी केला. तसेच अशा वक्तव्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा आहे का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
आपला संसदीय लोकशाहीवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांनुसार आपण शांतता व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. बॅनर घेऊन शांततेने आंदोलन करणे हीच आपली भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.