पुणे- बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकास मॉडेलला मंजुरी मिळाल्यामुळे आता बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार हे निश्चित झाले आहे. बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी त्यांच्यासमोर नवीन रंगमंदिराच्या रचनेचे सादरीकरण करण्यात आले.
पालकमंत्र्यांनी नवीन बालगंधर्व मंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच महापालिकेची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणार असून बालगंधर्व रंगमंदिराला अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले.
पुनर्विकासानंतर कसं असेल बालगंधर्व रंगमंदिर?
सध्या केवळ 500 फुटाचं कलादालन उपलब्ध असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या नव्या वास्तूमध्ये आता सुसज्ज अशी 10 हजार फुटांचे एक आणि प्रत्येकी पाच हजार फुटांची दोन अशी तीन नवीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. शिवाय यात पु. ल. देशपांडे आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या 54 वर्षांच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरुपी जतन करण्यात येणार आहेत.
बालगंधर्व पाडण्याचा रंगकर्मींचा विरोध
दरम्यान, बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाला नाट्य निर्माते आणि रंगकर्मींनी विरोध केला आहे. बालगंधर्व मंदिर पाडण्याच्या अवस्थेमध्ये नाही. त्यामुळे विकास करायचा तर बाजूला करा मात्र बालगंधर्व पाडू नका अशी भूमिका मांडली आहे. एकीकडे बालगंधर्व रंगमंदिराशी प्रत्येक पुणेकरांचे भावनिक नाते आहे कालानुरूप त्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे बालगंधर्व न पाडता त्याचा विकास करावा अशी मागणी रंगकर्मींकडून केली जात आहे.