जालना – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. खोतकर यांच्याशी संबंधित तब्बल ७८ कोटी ८० लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये खोतकर यांच्या मालकीच्या जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, एक फ्लॅट आणि एक बिल्डिंग याचा समावेश आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात…
राज्यात एकीकडे शिवसेनेवर राजकीय संकट कोसळलेले असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलत खळबळ उडवून दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी दोन दिवस छापेमारी केली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे.
शिवसेनेसाठी हा खूप मोठा फटका आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून खोतकर सध्या मुंबईत असून या कारवाई बाबत आम्हाला काही माहीत नाही. आम्ही यासंदर्भात न्यायालयात दाद मागू, असं खोतकर यावेळी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचं एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झालं होतं. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची सलग 12 तास चौकशी केली. पण 12 तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं नव्हतं.
खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच “अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोतकरांना ही 100 एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. ही जमीन साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास 240 एकर आहे. त्याची एकूण किंमत 1 हजार कोटी इतकी आहे”, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.