बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यात अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आले. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर खळाळून हसणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आता सावध पावित्रा घेतला आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे, असे मुंडे म्हणाले. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणले, “मिटकरी यांनी केलेलं वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला,” तसंच आपण अमोल मिटकरी यांच्याशी बोललो असून त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.
“कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. जात-पात, धर्म हे आमच्या अंगालादेखील शिवलेलं नाही. आमच्यासोबत सावलीप्रमाणे हे लोक उभे आहेत म्हणून इथपर्यंत पोहोचल्याची आम्हाला जाणीव आहे,” असं यावेळी मुंडेंनी म्हटले.
काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. लग्नामधील कन्यादान विधीवरून त्यांनी ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली. यावरुन ब्राह्मण महासंघाने आक्रमक पवित्रा घेत अमोल मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.