मुंबईमध्ये वातानुकूलित लोकल प्रवास तिकिटात ५० टक्के कपात, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

476 0

मुंबई – मुंबईकरांसाठी कडक उन्हामध्ये थंडावा देणारी आनंदाची बातमी. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करत असल्याची माहिती दिली आहे.

मुंबईचे तापमान ४० अंशाच्या आसपास गेल्याचे पाहायला मिळत आहे. उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. तरीदेखील मुंबईच्या एसी लोकलला मुंबईकर थंड प्रतिसाद देताना दिसत आहेत. कारण एसी लोकलचे भाडे अव्वाच्यासवा असल्यामुळे मुंबईकरांनी एसी लोकलकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आजचा निर्णय मुंबईकरांसाठी दिलासादायक म्हणावा लागेल.

या निर्णयाबाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, विविध स्तरातील लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असं आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होतं ३० टक्क्यांनी दर कमी करा, कोणी म्हणत होतं २० टक्क्यांनी दर कमी करा. मात्र देशाचे पंतप्रधान हे नेहमी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्हीही सामान्य माणसासाठी निर्णय घेत वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करत आहोत,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

रावसाहेब दानवे म्हणाले की, याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसंच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार आहे,’

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!