इंदापूर- पारंपरिक शेती न करता अधिकच्या उत्पन्नासाठी इंदापूरच्या दोन तरुणांनी शेळीपालन व्यवसाय सुरु केला. धाडस करून त्यांनी 54 शेळ्या आणि बोकडाची खरेदी केली. अचानक एके दिवशी एका तासाच्या आत सर्व शेळ्या दगावल्यामुळे या तरुणांवर आभाळ कोसळले आहे.
इंदापूर येथील नितीन पांढरे व अतुल घोडके या दोघांनी शेळी पालन व्यवसाय सुरु केला होता. या दोघांनी गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारातून 54 शेळ्या आणि बोकडाची खरेदी केली. रविवारी अवघ्या 1 तासाच्या आतमध्येच या सर्व शेळ्या दगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे या तरुण शेतकऱ्यांवर अक्षरशः आभाळ कोसळले आहे.
पशुवैदयकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी प्राथमिक तपासणी करुन चार शेळ्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवून दिले आहेत. आता येथील अहवालावरच सर्वकाही अवलंबून आहे. अचानक सर्वच शेळ्यांचा मृत्यू झाल्याने विषबाधा की अन्य काही याचा तपास आता अहवालानंतरच लागेल.