पाटील-आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ ! म्हणाले…

480 0

पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, असं वक्तव्य करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली तर दुसरीकडं शरद पवार हे भाजपसोबतच आहेत; तुम्हाला लवकरच कळेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी केला. या दोन्ही वक्तव्यांमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये.

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. या पहाटेच्या शपथविधिबाबत जयंत पाटील यांनी नुकतंच एक खळबळजनक वक्तव्य केलं. ‘राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या अनुषंगानं शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही तर शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीनं शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.

जयंत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली असतानाच शरद पवार आजही भाजपसोबत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

शरद पवार आजही भाजपसोबत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत केला. आमची आघाडी ठाकरे गटासोबत झालीये महाविकास आघाडीसोबत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळं आंबेडकर यांच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील होण्याआधीच बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीये. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केल्यानंतर तीन-चार दिवसांनी त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. ‘लोक मला का दोष देतात तेच समजत नाही. आमच्या पक्षाचं भाजपसोबत जाण्याचं आधीच ठरलं होतं. फक्त मी पहिला गेलो. 2019 च्या लोकसभेआधीच आमचं ठरलं होतं, असं अजित पवारांनी त्या मुलाखतीत सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी निदर्शनास आणून दिलं. शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडायचं होतं. कारण शिवसेनेला सत्तेची गरज नव्हती. गरज होती ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसला. शिवसेनेनं सत्ता आपल्या हाती ठेवली असती तर सरकार पडलं नसतं, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तुम्ही महाविकास आघाडीत सामील होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना ते आताच सांगता येणार नाही. कारण आम्हाला महाविकास आघाडीत घेऊन जायचं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आमच्यासोबत आणायचं याबाबतचं वकीलपत्र आम्ही उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. त्यामुळं तेच काय ते ठरवतील, असंही प्रकाश आंबेडकरांनी या मुलाखतीत सांगितलं.

जयंत पाटील म्हणतात पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी तर

प्रकाश आंबेडकर म्हणतात शरद पवार हे भाजपसोबतच; या दोन्ही वक्तव्यांच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्याचं अधोरेखित होतंय. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीबाबतचा महाविकास आघाडी संदर्भातला निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, असा अल्टिमेटम राष्ट्रवादीनं शिवसेनेला दिलाय. या वक्तव्यांमुळं सर्वांत मोठी कोंडी झालीये ती शिवसेनेची. शिवसेनेनं आंबेडकारांना आपल्या गोटात तर सामावून घेतलं पण त्यांना महाविकास आघाडीत सामावून घेण्यात उद्धव ठाकरेंच्या वकिलीला यश येणार का ? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!