मा. मुख्यमंत्री महोदय,
सप्रेम नमस्कार!
मी… मस्साजोगचा माजी सरपंच संतोष देशमुख बोलतोय… आज मला जाऊन अडतीस दिवस झाले… माझं शरीर तर केव्हाच मातीत मिसळलं गेलं पण वेदना आजही तितक्याच होताहेत. खूप मारलं त्यांनी; खूप मारलं! अचानक घडलेल्या अपघातात एखाद्याला आलेलं मरण आणि एखादा मरता मरत नाही म्हणून हाल हाल करून त्याला दिलं गेलेलं मरण यात खूप फरक असतो. त्यांनी मला इतकं मारलं, इतकं मारलं की, मरणानंतर सरणावर जातानाही प्रचंड वेदना झाल्या! एखाद्याचा जीव कसा जातोय हे पाहातानाचा असुरी आनंद घेणारी माणसं मला मार मार मारत होती. कुणी पाइपानं फोडून काढत होतं, कुणी फायटरनं घाव घालत होतं, कुणी दांडक्यानं सोलवटून काढत होतं, कुणी रॉडनं ठोके टाकत होतं. कुणी तारा सर्वांगाला टोचत होतं, तर कुणी कोयता, तलवारीचे वार करत होतं. हे सारं कमी होतं की काय म्हणून आळीपाळीनं पुढं येऊन एकेक जण छातीवर उड्या मारत होतं. तोंड सुजलं होतं, डोकं फुटलं होतं, छाती फाटली होती, पाठ मोडली होती. ‘पाणी पाजा, थोडं पाणी पाजा हो,’ अशी गयावया केली, हात जोडले, पण… पण ज्यांच्या संवेदनाच हरवल्या होत्या त्यांना माझ्या वेदना काय कळणार होत्या?
जो तो माझ्या मरणाची वाट पाहात होता, मी कसा मरतोय हे बघण्याची मजा लुटत होता. आता जीव गुदमरू लागला होता, श्वास कोंडू लागला होता, माझा काळ मला समोर दिसू लागला होता… तरी देखील मी जिवाच्या आकांतानं ओरडत होतो, विनवण्या करत होतो… “बाबा ओsss मला सोडा, मी कुणालाही तुमची नावं सांगणार नाही. माझ्या गावातल्यांना पण सांगणार नाही… आता बास करा, मारू नका…” तरीसुद्धा ते मला मारतच राहिले, मारतच राहिले!
मुख्यमंत्री महोदय, मी तर या जगातून गेलो; आता मागं उरलंय ते उघड्यावर पडलेलं माझं कुटुंब! आई, भाऊ, पत्नी, मुलं आणि माझं गाव! मरताना या सर्वांना आठवलं, रक्ताळलेल्या डोळ्यांतून आणि अंधुकलेल्या नजरेतून सर्वांना पाहून घेतलं; आता या सर्वांचं पुढं काय होणार या विचारात क्षणभर गढून गेलो आणि डोळे मिटले गेले ते कायमचेच!
कुटुंबासाठी, गावासाठी बरंच काही करायचं होतं. विकासाच्या कामासाठी खूप खूप झटायचं होतं. पण, नियतीच्या मनात मात्र मला आताच न्यायचं होतं. अर्ध्यावर डाव मोडला, संसार उघड्यावर पडला, मी पाहिलेल्या स्वप्नांवर काळाचा वरवंटा फिरला.
असो, आता मात्र माझी तुम्हाला एकच विनंती आहे… मला, माझ्या कुटुंबाला न्याय द्या आणि माझ्या गावाकडं लक्ष द्या! माझी आई, भाऊ, पत्नी, मुलं यांना संरक्षण द्या. माझ्या गावाला काही कमी पडू देऊ नका. गावकऱ्यांकडं दुर्लक्ष करू नका. मी, माझं कुटुंब आणि माझं गाव आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
https://whatsapp.com/channel/0029Vb2Z6498F2pHMwM9YA1S
मी तर निघून गेलो, मी काही आता परत येऊ शकणार नाही पण या महाराष्ट्रात इथून पुढं दुसऱ्या कुणाचाही संतोष देशमुख होणार नाही, त्याच्या वाट्याला असं वेदनादायी मरण येणार नाही, याची काळजी घ्या! माझी फक्त एकच मागणी आहे, मला, माझ्या कुटुंबाला न्याय द्या आणि माझ्या गावाकडं लक्ष द्या…
बस इतकंच!
न्यायाच्या प्रतीक्षेत…
संतोष देशमुख
मस्साजोग (ता. केज, जि. बीड)
शब्दांकन : संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, Top News मराठी)