दीपक केसरकर : कुणी कुणाला पहिला कॉल करायचा ? मातोश्री की भाजप श्रेष्ठी; या मानापमानावरून भाजप-शिवसेना युतीचं घोडं अडलंय हो !
सुधीर मुनगंटीवार : सरकारमध्ये शिवसेना-भाजपा युती आहेच. आम्ही तर एकनाथ शिंदेंना रोजच फोन करतो. ते रोजच फडणवीसांच्या संपर्कात असतात. त्यामुळं आमच्याकडून उद्धव ठाकरेंना फोन जाण्याचा प्रश्नच नाही.
…………………………….
मानापमानात अडलंय युतीचं घोडं !
शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटानं भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळं आता पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीये. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणतात,”मी शिंदेंचा प्रवक्ता आहे, खासदारांचा नाही. ज्या दिवशी खासदार आमच्यावतीनं तुम्ही बोला, असं सांगतील, तेव्हा मी बोलेन पण माझ्या माहितीनुसार, हे गाडं मानापमानावरून अडलंय. आधी फोन कुणी करायचा यावरून मातोश्री आणि भाजपा श्रेष्ठी यांच्यातली बोलणी अडली आहेत. तुम्ही महाविकास आघाडी तोडा आम्ही 50 आमदार महाराष्ट्रात येऊ, असं केव्हाच सांगितलं होतं पण आघाडी तोडली का ? पण आज ती अनायासे तुटलीये तेव्हा आता तरी निर्णय घ्या.”
………………………………….
उद्धव ठाकरेंना आम्ही फोन करायचा ?
दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सावध प्रतिक्रिया दिलीये. मुनगंटीवार म्हणतात,”आता शिवसेना-भाजपा युती आहेच. एकनाथ शिंदे शिवसेनेच नेते असून त्यांच्यासोबत असलेले आमदार अजूनही आपण शिवसैनिक असल्याचं सांगत आहेत. त्यामुळं सरकारमध्ये शिवसेना-भाजपा युती आहेच. आम्ही तर एकनाथ शिंदे यांना रोजच फोन करतो. ते रोजच फडणवीसांच्या संपर्कात असतात. त्यामुळं आमच्याकडून उद्धव ठाकरेंना फोन जाण्याचा प्रश्नच नाही.”
……………………………
पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य !
कोण कुणाला पहिला फोन करणार यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात,”कोण फोन करणार याबाबत मी सांगू शकत नाही मात्र आमच्या पक्षप्रमुखांचा जो निर्णय असेल तो आम्हास मान्य असेल.”
…………………………………
एक कॉल… प्रॉब्लेम सॉल्व्ह !
कुणी कुणाला पहिला फोन करायचा यावरच अडलंय ना ? मग त्यात एवढा विचार काय करायचाय ? दोन जिवलग मित्र एकमेकांशी कट्टी घेतात, समोर आले तरी नाक-तोंड मुरडतात पण आतल्या आत झुरत बसतात… काही दिवस लोटल्यानंतर एकमेकांवाचून राहाता येत नसल्याचं कळताच अन्य मित्रांकडून ‘तो’ बोलला तर ‘मी’ बोलेन, असे ‘पहले आप, पहले आप’चे निरोप पोचवायला सुरुवात करतात… पण एवढं करूनही काहीच घडत नसल्याचं पाहून स्वतःच एकमेकांचे फोन डायल करतात. इकडून ‘हा’ फोन करतो त्याचवेळी तिकडून ‘तो’ फोन करतो म्हणून दोघांनाही दोघांचा फोन बिझी लागतो. काही वेळानंतर कुणाचा कुणाला तरी फोन लागतो आणि मग एकमेकांना ठेवणीतल्या शिव्या हासडून झाल्यानंतर कट्टीचं रूपांतर गट्टीत होतं. दोघांच्याही मनात आहे तर वाट कसली बघताय ? फिरवा नंबर आणि लावा फोन… एक कॉल… प्रॉब्लेम सॉल्व्ह !
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी