पुण्यात कोयता गॅंग ने उच्छाद मांडलेला असताना हीच कोयता गॅंग चक्क मस्साजोगला जाऊन पोहोचली आहे. मस्साजोग मधून या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. नेमकं पुण्याच्या कोयता गॅंगचं मस्साजोगशी काय कनेक्शन आहे ? आणि पुण्यात गुन्हा करून हे आरोपी मस्साजोगला नेमके कशासाठी गेले पाहूया..
परभणीतील गंगाखेडमधील सौरभ श्रीराम राठोड हा १७ वर्षीय युवक पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. 23 मार्च रोजी रात्री सौरभ राठोड हा त्याच्या काही मित्रांबरोबर हॉटेलमधून जेवण करून परतत असताना त्याचे ओंकार देशमुख नावाच्या तरुणासह वाद झाले. ‘तु ओंकार देशमुखला खुन्नस देवुन का बघतोस ? तुला माहीत आहे का ओंकार देशमुख कोण आहे ? थांब, तुला जिवंतच सोडणार नाही’, अशी धमकी ओंकार देशमुख च्या मित्रांनी दिली. त्यानंतर गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे व दोन अनोळखी दोघांनी कोयत्याने पोटात व पाठीवर वार करीत दगडाने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्यस्थी करायला गेलेला सौरभ राठोड याचा मित्र यश राजू धनवटे यालाही दमदाटी करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सर्व आरोपीं विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र हल्ला करून हे सर्व आरोपी बीडच्या मस्साजोगला पसार झाले. त्यावेळी लागलीच रांजणगाव पोलिसांनी बीड पोलिसांनी संपर्क करत आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस पेट्रोल पंप परिसरात दबा धरून बसले होते. त्यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी पोलिसांना पाहून शेतात पळ काढला. मात्र बीड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
बीड पोलिसांकडून या आरोपींचा ताबा रांजणगाव पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणात आरोपींना कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या प्रकरणातील पीडित सौरभ राठोड आणि यश धनवटे यांची प्रकृती गंभीर असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान केवळ एकमेकांकडे बघण्यावरून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या किरकोळ गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक ॲक्शन घेणं गरजेचं आहे.