यांची डोकी-बिकी फिरलीत का ? (विशेष संपादकीय)

191 0

छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने आदर्श झाले – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

शिंदेंनी केलेलं बंड हे छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेसारखं – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

शिंदेंचं बंड म्हणजे छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याप्रमाणं – आ. संजय गायकवाड
…………………………..

राज्यपाल, मंत्री, आमदार यांना झालंय तरी काय ? कुणाची तरी खुशमस्करी करण्यासाठी आपण केलेल्या कामाची थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाशी तुलना करतायत. यांची डोकी-बिकी फिरलीत का ? गेली काही दिवसांपासून राज्यात फक्त शिवाजी महाराजांचा अवमान करणं सुरू आहे. छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याचं या लोकांनी कंत्राट घेतलंय का ?
…………………………….

वाळत घातलेली धोतरं गुंडाळा, पिशवीत भरा नि पहिलं निघा..!

आधी राज्यपाल, मग मंत्री आणि आता आमदार… ही यांची बेताल वक्तव्यं ऐकली की कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. बरं असंही नाही की या विद्वानांनी आपलं ज्ञान पहिल्यांदाच पाजळवलंय. याआधीही या महाभागांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राज्यपालांनी तर आपल्या मर्यादा केव्हाच ओलांडल्यात. त्यांच्या बेछूट आणि निरर्थक बडबडण्याला महाराष्ट्र कधीचा कंटाळलाय पण हे महाशय स्वतःला पदमुक्त करून घेतील तर शपथ ! केंद्राकडून त्यांना योग्य ती समज देणं सोडा; त्यांच्या वक्तव्यांविषयी कुणी चकारही काढला नाही. शिवाय राज्यात सत्तेत सहभागी असलेली भाजपची नेतेमंडळी राज्यपालांचं फाटलेलं धोतर शिवण्यातच दंग आहेत. अहो, फाटकं धोतर एकवेळ शिवता येऊ शकेल पण फाटक्या तोंडाचं करायचं काय ? काय म्हणे तर छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने आदर्श झाले… जुने आदर्श ? छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी जुने आदर्श ठरू शकतात ? अहो, महामहिम राज्यपाल, आपलं वय काय ? आपलं पद काय ? आणि आपण बोलताय काय ? हा आमचा महाराष्ट्र केवळ देशातच नव्हे तर साऱ्या जगात ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं ओळखला जातो ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराज… बस्स ! बाकी आम्हाला माहीत नाही. राज्यपाल महोदय, खूप घेतलात आमचा पाहुणचार… आता वाळत घातलेली आपली धोतरं गुंडाळा, पिशवीत भरा आणि लवकरात लवकर पहिलं इथनं निघा..!
……………………………………

कुठं शिंदेंचं बंड नि कुठं शिवरायांची आग्र्याहून सुटका ?

राज्यपालांच्या वक्तव्यानं आधीच वातावरण तंग झालं असताना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगडावर जाऊन आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश पाडला. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाची त्यांनी छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाशी तुलना केली. आता काय म्हणावं ह्या लोढांना ? कुठं शिंदेंचं बंड आणि कुठं शिवरायांची आग्र्याहून सुटका ? बरं लोढांनी हे वक्तव्य कुठं करावं ? शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर ! या अशा बेताल वक्तव्यामुळं विरोधकांकडून लोढांचे कपडे फाडायला सुरुवात होताच उघडं पडलेल्या लोढांना झाकण्यासाठी सरकारमधील मंत्री-आमदार लगेच आपापले पदर घेऊन लोढांचं उघडं अंग झाकायला तयार ? छत्रपती शिवरायांची चरणधूळ होण्याची आपल्या कुणाचीही लायकी नसताना आपण आपल्या राजकीय बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी करतोय ?
………………………..

कुठं शिवरायांचा गनिमी कावा नि कुठं सुरत-गुवाहाटीचा कालवा ?

तिकडं लोढांचे कपडे फाटत असताना इकडं आणखी एक उपटसुंभ उगवला. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदेंचं बंड म्हणजे छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा, असं म्हणत आपल्या दिव्य ज्ञानाची प्रचिती अवघ्या महाराष्ट्राला आणून दिली. अरे, कुठं शिवरायांचा गनिमी कावा आणि कुठं तो तुमचा सुरत-गुवाहाटीचा कालवा ? महाराष्ट्रवासियांनो, आता एकच करा काहीही करून पहिल्यांदा ह्यांना घालवा.
.………………………………

वाचाळवीरांचे हे असले तोंडाळ पट्टे वारंवार फिरू लागले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर वीर मावळ्यांचा वारसा सांगणाऱ्या आम्हा महाराष्ट्रवासीयांकडून भविष्यात दांडपट्टा फिरल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. तूर्तास इतकंच !

– संदीप चव्हाण

वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!