नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला असून राज्यात भाजपाच्या केवळ नऊ जागा निवडून आले आहेत.
भाजपाच्या या महाराष्ट्रातील पराभवानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे एक्स( पूर्वीचे ट्विटर) पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
https://x.com/Madhavbhandari_/status/1798932116425880025?s=19
माधव भंडारी यांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हंटले आहे की मी समाज माध्यमांवर तसा फारसा सक्रिय नसतो, पण आज महाराष्ट्र भारतीय जनता पक्षातील सर्वात जुन्या व अनुभवी कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून काही गोष्टी मला लिहाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहित आहे.
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील निकाल हे आपल्या सगळ्यांसाठी अनपेक्षित होते. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि हितचिंतकांमध्ये स्वाभाविकच दुःखाची भावना आहे. उलट सुलट चर्चा आणि अफवांना पेव फुटलेलं आहे.पण या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊन चालणार नाही.
आपल्यातल्या अनेकांना 1984 आणि 2004 च्या घटना लक्षात असतील. पण त्या दोन्ही वेळेला आपण भारतासाठी, महाराष्ट्रासाठी झटत राहिलो आणि अपेक्षेपलीकडे नवीन सामर्थ्याने उभे राहिलो. ह्या वेळेला तर विरोधकांना आणि आपल्याला मिळालेली मते सारखी आहेत. त्यामुळे ही लढाई पूर्वीइतकी अवघड नाही.
यावेळचे स्थित्यंतर खरंतर एक खडतर परीक्षा आहे. या परीक्षेतून तावून सुलाखून पुन्हा उभे राहण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. असे अनेक अनुभव पचवत पचवतच आपण इथपर्यंत आलो आहोत. पक्षातील कार्यकर्त्यांच्या नवीन पिढीसाठी हा एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे, राजकारण आणि समाजकारण यांचे वेगवेगळे कंगोरे समजून घेण्याची ही संधी आहे. मी १९८० पासून भारतीय जनता पार्टीचे काम करतोय. माझ्यासारख्या अनेकांनी हार-जीतीसाठी नाही तर केवळ विकास आणि भारतीय राष्ट्रवादासाठी आपली आयुष्य पणाला लावली आहेत. ही लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. ती तात्कालिक जय-पराजय, व्यक्तिगत भावना, हेवेदावे, न्याय-अन्याय यांच्या पलीकडची आहे. लढणं हे माझं काम आहे, आपल्या सगळ्यांचं काम आहे, आणि ते मी स्वत: पेटून उठून करणार आहे. माझ्या सर्व प्रकारच्या कारकिर्दीच्या ह्या अखेरच्या टप्प्यावर मी अजून निर्धाराने व संपूर्ण सामर्थ्याने पक्षासाठी, पक्षाच्या नेतृत्वासाठी आणि कार्यकर्त्यासाठी उभा राहणार आहे.
येणारे चार महिने हे फक्त आपल्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑक्टोबर 2024 मधली निवडणूक भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पूर्ण ताकतीने लढणं आणि जिंकणं हे 21 व्या शतकातल्या महाराष्ट्रासाठी नितांत आवश्यक आहे. त्यामुळे माझी महाराष्ट्रातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आत्मविश्वास बाळगू, संयम ठेवू. वायफळ चर्चा आणि अफवा यांच्यात न गुंतता नवीन विश्वासाने आपल्याला महाराष्ट्रासाठी झटायचे आहे. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी @narendramodi यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये आणि मा. देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पक्ष खंबीरपणे उभा राहणार आहे.
स्व. अटलजींच्या शब्दांचा आधार घेऊन मी शेवटी एकच खात्री देईन “अंधेरा हटेगा, कमल खिलेगा”