आज केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परीषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीची घोषणा केली आणि राज्यात आचारसंहिता लागू झाली निवडणूक दरम्यान आपण सातत्यानं कोणत्या ना कोणत्या आचारसंहिता हा शब्द ऐकत असतो… ही अचारसंहिता म्हणजे नेमकं काय?
लोकशाहीमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोगाकडून पारदर्शक निवडणुका व्हाव्यात, निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांचं मत स्पष्ट व्हावं यासाठी काही नियम केलेले असतात. निवडणूक जाहीर होताच हे नियम लागू होतात… ते नियम म्हणजेच आचारसंहिता होय… ही आचारसंहिता सरकार, प्रशासन, राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवणारे उमेदवार यांना लागू असते… या नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाते.
निवडणुकीच्या आचारसंहितेबद्दल सर्वसामान्यांना अनेक प्रश्न पडतात. अशाच काही महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेऊयात.
पहिला प्रश्न आहे आचारसंहिता कधीपासून लागू होते?
निवडणूक आयोगाकडून कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली जाते. यामध्ये निवडणुकीची तारीख जाहीर करताच तात्काळ परिणामाने आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती कायम राहते. उदाहरणासाठी सांगायचं झाल्यास यंदाच्या लोकसभा निवडणूकीची तारीख जाहीर करण्यासाठी 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे… या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होईल…
दुसरा प्रश्न आहेआचारसंहिता कोणत्या भागात लागू केली जाते?
लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू केली जाते. तर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या एखाद्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित मतदारसंघाच्या परिसरातच लागू केली जाते. याचाच अर्थ 16 मार्च रोजी आयोगाकडून निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होईल….
तिसरा प्रश्न आहे आचारसंहिता पहिल्यांदा कधी लागू झाली?
देशात पहिली आचारसंहिता 1960 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान लागू करण्यात आली. तर 1962 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सर्व देशभरात त्यामध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोणत्या गोष्टींचे पालन करावे लागेल याची नियमावली होती. त्यामुळं 1962च्या लोकसभा निवडणुकांपासून आचारसंहितेच्या नियमांचं पालन करणे देशात बंधनकारक करण्यात आलं…
चौथा प्रश्न आहे आचारसंहिता कोणत्या कायद्यान्वये लागू केली जाते?
तसं बघितलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेला कोणत्याही कायद्याचा आधार नाही. ही आचारसंहिता सर्व राजकीय पक्षांचे मत आणि तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. तसेच त्यामध्ये वेळोवेळी बदलही केले जातात.
पाचवा प्रश्न आहे आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
आदर्श आचारसंहितेमध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार, सभा, मिरवणुकांचे नियोजन कसं करावं, त्यासाठी काय नियम आहेत याचा एक आराखडा आचारसंहितेत नमूद असतो. तसेच मतदान दिवसाचे कामकाज आणि कामकाजादरम्यान कशा पद्धतीने वागावं आणि कशा पद्धतीने वागू नये याचीही नियमावली नमूद केलेली असते. या सगळ्या नियमांचं पालन करणं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी बंधनकारक असतं…..
सहावा प्रश्न आहे पक्ष आणि उमेदवारांसाठी मुख्य मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?
निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही पक्ष किंवा उमेदवाराने समाजात द्वेष पसरेल, किंवा त्याच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध जाती आणि समूदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कृती करू नये. हे उमेदवार आणि पक्षासाठी आखलेलं प्रमुख मार्गदर्शक तत्वं आहे… याशिवाय निवडणुकीच्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार विविध तत्वे यामध्ये समाविष्ट केली जातात…..
सातवा प्रश्न आहे निवडणूक प्रचारासाठी धर्माच्या आधारे मत मागता येतात का? धार्मिक स्थळांचा वापर करता येतो का?
याचं सरळं सोपं उत्तर आहे नाही…. निवडणूक प्रचार आणि धार्मिक स्थळे यांच्याविषयी आचारसंहितेमध्ये विस्तृत नियमावली दिलेली आहे. उमेदवार किंवा पक्षाला कोणतीही मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा इतर धार्मिक स्थळांचा निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापर करता येणार नाही. सोबतंच कोणताही राजकीय पक्ष जात किंवा धर्माच्या आधारावर मते मागू शकत नाही किंवा अशा कृतीत सहभागी होणार नाही. त्याचसोबत मते मिळवण्यासाठी जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करता येणार नाहीत. असा स्पष्ट उल्लेख नियमावलीत दिलेला आहे…
आठवा प्रश्न आहे निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात प्रचार करता येतो का?
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत मतांसाठी प्रचार करण्यास मनाई आहे. याचाच अर्थ मतदानाच्या दिवशी उमेदवार मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसराच्या बाहेर शांततेत प्रचार करू शकतो… मात्र, 100 मीटरच्या आतमध्ये प्रचार केल्यास उमेदवारावर किंवा काही वेळा पक्षावर कारवाई केली जाते.
नववा प्रश्न आहे मंत्री शासकीय मनुष्यबळ किंवा वापरू शकतात का?
एकदा निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहितेनुसार कोणत्याही सरकारला किंवा मंत्र्याला सरकारी योजना जाहीर करता येत नाही. तसेच कोणत्याही विकासकामाचं उद्घाटन करता येत नाही. सरकारच्या निधीतून होणाऱ्या कोणत्याही विकासकामाची पायाभरणी किंवा भूमिपूजनही करता येत नाही. यासोबतच निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहने, सरकारी विमान किंवा सरकारी बंगला वापरता येत नाही. त्याचसोबत निवडणुकीच्या कामासाठी सरकारी अधिकारी, मनुष्यबळाचा वापरही मंत्र्यांना करता येत नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही मंत्र्याला आपला प्रवास निवडणूक प्रचाराशी जोडता येत नाही.
दहावा प्रश्न आहे शासकीय अधिकाऱ्याची बदली किंवा बढती होऊ शकते का?
आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात येते….. अधिकाऱ्याची बदली किंवा बढती आवश्यक वाटल्यास आयोगाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर आयोगानं आदेश दिल्यास त्या संबंधित कार्यवाही केली जाते….
अकरावा प्रश्न आहे निवडणूक रॅली, मिरवणूक काढायची असल्यास कोणती मार्गदर्शक तत्व आहेत?
कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक रॅली किंवा मिरवणूक काढायची असल्यास प्रथम पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या परिसरात किंवा भिंतीवर त्याच्या परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर, बॅनर किंवा झेंडा लावता येत नाही…. पोलिसांनी रॅलीला परवानगी दिल्यानंतर आवश्यक नियमावलीचं पालन करत प्रचार रॅली काढता येते…..
बारावा प्रश्न आहे मतदारांना आणण्यासाठी पक्ष आणि उमेदवार वाहनांचा वापर करू शकतात का?
मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यांच्या वाहनांचा वापर करू शकत नाहीत. तसेच राजकीय पक्ष कोणत्याही मतदाराला त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी धमकावू शकत नाहीत. तसं केल्यास उमेदवारावर आणि पक्षावर कारवाई होऊ शकते….
तेरावा प्रश्न आहे निवडणुकीच्या काळात पैसे आणि इतर गोष्टींचं वाटप करता येऊ शकतं का?
विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदारांना भुलवू शकतील अशी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात येते… यावेळी खास करून मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवली जातात. सोबतच संपूर्ण निवडणुकीच्या काळात दारू आणि पैसे वाटण्यासही बंदी आहे.
या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात आणखी एक प्रश्न उपस्थित झाला असेल…. आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होते?
कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने आचारसंहिता पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकतं. आवश्यक असल्यास फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.