Nagpur Riot : ना Hindu, ना Muslim समाजानं; दंगल घडवली औरंग्यानं! थडग्यातला ‘औरंग्या’ नागपूरवर चालून गेला…

2915 0

औरंग्यानं त्याच्या 49 वर्षांच्या शासनकाळात जे काही केलं तेच त्यानं काल नागपुरात करून दाखवलं. औरंग्यानं खुलेआम कत्तली घडवल्या होत्या, लुटालूट, जाळपोळ केली होती त्याचीच दुसरी आवृत्ती काल नागपुरात पाहायला मिळाली. एकमेकांना दगडं मारून, नंग्या तलवारी नाचवून आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या कृतीतून आजही औरंग्या आणि त्याचं क्रौर्य जिवंत आहे हे साऱ्या जगाला दिसलं. मी तर म्हणतो, “नागपुरात जे काही घडलं, घडवलं गेलं ते औरंग्याशिवाय कुणी करूच शकणार नाही. ना हिंदू, ना मुसलमान; ही दंगल घडवण्यासाठी तो क्रूर, पापी औरंग्या काही काळासाठी का होईना पण खुलताबादच्या त्याच्या थडग्यातून बाहेर आला आणि नागपूरवर चालून गेला…”

 

हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल, अशी चिथावणीखोर वक्तव्यं करून काही तथाकथित नेत्यांनी आधीच औरंग्याची कबर खोदण्याचं काम केलं आणि 318 वर्षे खुलताबादच्या कबरीत खितपत पडलेला क्रूर, पापी औरंग्या जागा झाला… आपल्या क्रूर, निर्दयी विचारांचा अंमल ज्या कुणावर आजही आहे मग तो हिंदू असो की मुसलमान, त्या प्रत्येकाच्या अंगात तो असा काही शिरला की, त्यानं त्याच्यातली माणुसकी झोपवली आणि राक्षस जागा केला.

दंगेखोरांना चेहरा नसतो; त्यावेळी तो माणूस, माणूस म्हणून उरलेला नसतो, तो पशू बनलेला असतो. कट्टर धर्मांधवादाच्या विचारांनी त्याच्या बुद्धीचा ताबा घेतलेला असतो. मग, अशा अविचारी हल्लेखोराच्या हातून फक्त एकच गोष्ट घडू शकते आणि तो म्हणजे हिंसाचार! काल रात्री असे एक-दोन नव्हे तर शेकडो हल्लेखोर नागपुरात जमा झाले आणि त्यांनी त्यांच्या अंगात संचारलेल्या औरंग्याचा हुकूम मानायला सुरूवात केली.
दगडं, रॉड, सुरा-तलवारी, पेट्रोल बॉम्ब या हत्यारांनिशी हल्ला चढवला आणि नागपुरातील महाल परिसराचा ‘माहोल’च बदलून टाकला! औरंग्याच्या मुघल सैन्यानं जशी उभी पिकं जाळून नष्ट केली होती, तशी या हल्लेखोरांनी एका रांगेत उभी असलेली वाहनं जाळून टाकली. आपण काय करतोय हे कुणाला दिसू नये किंवा आपल्याला हटकायला कुणी घराबाहेर पडू नये म्हणून घरं अथवा दुकानांबाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. घरांवर दगडफेक करून दहशत निर्माण केली.

नागपुरातील दंगेखोरांमध्ये दिसून आलेली ही वृत्ती त्या व्यक्तीच्या विचारांचा ताबा घेतलेल्या औरंग्याची प्रवृत्ती होती. पोलिसांवर अंदाधुंद दगडफेक, जेसीबी, रोडरोलरला लावण्यात आलेल्या आगी, अग्निशमन दलाच्या जवानांना दंगेखोरांच्या रोषाचा करावा लागलेला सामना, रस्त्यांवर पडलेला दगडांचा खच, जाळपोळीच्या खुणा ठळकपणे दाखवणारे काळेकुट्ट डाग, निव्वळ सांगाडा उरलेल्या आणि खाक होऊन पडलेल्या असंख्य गाड्या, दारं तोडून टाकण्यात आलेली उघडी घरं, तोडफोड केली गेल्यानं अस्ताव्यस्त पडलेलं सामानसुमान आणि भीती व दहशतीच्या सावटाखाली सुन्न पडलेली, भेदरलेली मनं…

हे सारं काही नागपूरकरांनी काल पाहिलं, अनुभवलं आणि 17 व्या शतकातील जणू औरंग्याचा काळ त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. अखेर सरशी पोलिसांची झाली, दगडफेक, जाळपोळ, दंगल नियंत्रणातही आली, काही दंगेखोरांना अटकही झाली पण खरा दंगेखोर मात्र आपलं काम करून निघूनही गेला!

नागपूर पेटवून, आपल्या मनातली आग शमवून तो पुन्हा एकदा
आपल्या थडग्यात शिरला… जणू काही घडलंच नाही, नागपुरात जाऊन त्यानं काही केलंच नाही! आता हा औरंग्या काही दिवस थडग्यात निजेल, मग पुन्हा कुठल्या तरी राजकीय नेत्याचं भान सुटेल, मग पुन्हा एकवार कुणी तरी त्याचं थडगं खोदेल आणि मग पुन्हा एकदा औरंग्या त्याच्या थडग्यातून उठेल आणि आता कोणतं शहर असं म्हणून नव्या शहरातील नव्या दंगेखोरांना शोधत फिरेल…

नागपूरमधील कालच्या दंग्यानंतर आज, आता जी काही नीरव शांतता पसरलीये ना ती केवळ काही काळापुरती! कारण एखादा तथाकथित नेता पुन्हा एकदा काही बरळण्याची खोटी की,
आम्ही तयार… दगडं मारायला, नंग्या तलवारी नाचवायला, घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकायला, गाड्या पेटवायला आणि कधी माणसं तरी कधी त्यांची मनं जाळायला…

कारण दंगेखोरांना चेहरा नसतो; त्यावेळी तो माणूस, माणूस म्हणून उरलेला नसतो, तो पशू बनलेला असतो. तेव्हा तो ना
हिंदू असतो ना मुसलमान; तेव्हा तो दंगल घडवायला निघालेला औरंग्या असतो!

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
Top News मराठी, पुणे

Share This News
error: Content is protected !!