देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे.रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. आता नव्या राष्ट्रपतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात भारताच्या राष्ट्रपती पदाची निवड प्रक्रिया नेमकी कशी असते ?
राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो.विधान परिषदेच्या सदस्यांचा यामध्ये समावेश होत नाही. तसंच राज्यसभा आणि लोकसभेत नियुक्त करण्यात आलेले सदस्य या मतदान प्रक्रियेचा भाग नसतात.महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचं मूल्य वेगवेगळं असतं. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मताचं मूल्य एक सारखंच असतं. पण वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या आमदारांच मूल्य वेगवगेळं असतं. ते त्या त्या राज्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं.याचा अर्थ असा की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशा राज्यातील एका आमदाराच्या मताला जास्त वेटेज तर मणिपूर, गोवा, त्रिपुरा सारख्या लोकसंख्येनी लहान असलेल्या राज्यांतील आमदारांच्या एका मताला कमी वेटेज असतं.उत्तर प्रदेशातील एका आमदाराला 208 इतकं वेटेज तर देशातील प्रत्येक खासदाराला 708 इतके वेटेज असतं.
यात महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचं मूल्य किती तर त्या त्या राज्यातल्या आमदारांचं वेटेज किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या राज्यांची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येनं भागली जाते. प्राप्त झालेल्या संख्येला नंतर 1000 नं भागलं जातं. त्यातून जो आकडा उत्तर म्हणून येतो तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचं वेजेट असतं. यासाठी 1971 ची जगगणना आधार मानली जाते.
1971 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या पाच कोटी, चार लाख होती. म्हणजेच 5 कोटी चार लाख भागिले 288 त्यातून येणाऱ्या संख्येला 1000 ने भागल्यानंतर 175 आकडा येतो म्हणजेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या मतांचं मूल्य हे 175 आहे.भारतात एकूण 776 खासदार आहेत. त्यांचे वेटेज 5 लाख 49 हजार इतके आहे. भारतात विधानसभेतील आमदारांची संख्या 4120 इतकी आहे. त्यांचे वेटेज 5,49,474 इतके आहे. दोन्ही समूहांचे एकत्रित मतदान 10,98,882 इतके आहे. म्हणजेच अंदाजे 11 लाख. महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर होत नाही.
एकूणच महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचं मूल्य आपण जाणून घेतलं आहे आता इतर राज्यांतील आमदारांचं मूल्य किती असतं?
उत्तर प्रदेश – 208
केरळ – 152
मध्य प्रदेश – 131
कर्नाटक – 131
पंजाब – 116
बिहार – 173
गुजरात – 147
झारखंड – 176
ओडिशा – 149