पुणे- पुण्यातील केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयांकडील पाणीपट्टीची १०५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कधी प्रयत्न करणार, असा सवाल सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना त्यांनी पात्र पाठवले आहे. या पत्रात वेलणकर म्हणतात की, पुणे महापालिका हद्दीतील केंद्र व राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे आज रोजी पाणीपट्टीची किती थकबाकी याची पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात माहिती अधिकारात माहिती मागितली असता या खात्यांकडे १०५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसून येत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे जवळपास ४७ कोटी रुपयांची, संरक्षण खात्याकडे ४६ कोटी रुपयांची तर रेल्वेकडे जवळपास ५ कोटी रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी आहे. याशिवाय पोस्ट, आकाशवाणी, बीएसएनएल या केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे तर PWD , police , MJP , MSEB यांसारख्या राज्य शासनाच्या आस्थापनांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे.
या सरकारी / निमसरकारी आस्थापनांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी आपल्याला जातीने लक्ष घालून त्या त्या आस्थापनांच्या प्रमुखांशी बोलून वेळप्रसंगी पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देऊन वसुली करावी. या निमित्ताने सामान्य थकबाकीदार आणि शासकीय थकबाकीदार यांना महापालिका एकच न्याय लावते हा संदेश सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये गेला पाहिजे अशी अपेक्षा वेलणकर यांनी केली आहे.