पुणे ,दि 3 : सरकारवर थेट प्रश्न उपस्थित करणं मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL) यांच्यासाठी नवीन नाही. “मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच,” हा त्यांचा जुना डायलॉग आज पुन्हा एकदा पुण्याच्या (PUNE) रस्त्यावर ऐकायला मिळाला आणि हजारो विद्यार्थ्यांमध्ये आशा निर्माण झाली.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीची जाहिरात उशिरा आल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आली आहे. ही वयोमर्यादा एक वर्षाने वाढवून द्यावी, या मागणीसाठी पुण्यातील डेक्कन (PUNE) परिसरात, भिडे पुलाखाली हजारो विद्यार्थी एकत्र जमले होते. आंदोलन तीव्र होत असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL) आंदोलनस्थळी दाखल झाले.
यावेळी त्यांनी केवळ पाठिंबा दर्शवला नाही, तर थेट मुख्यमंत्री कार्यालयातील (CMO) संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. याशिवाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RADHAKRUSHNA VIKHE PATIL) यांच्याशीही त्यांनी संपर्क केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.
विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत, तर मी इथून हलणार नाही. प्रश्न प्रलंबित राहिले तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, कारण महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत,” असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील (JARANGE PATIL)यांनी दिला.
जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जरांगे पाटील आंदोलनात उतरल्यामुळे सरकार आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.