पुणे- पुणे महापालिकेसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे धरणात असलेला पाण्याचा कमी साठा तर दुसरीकडे २३ गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी अशा कात्रीत महापालिका प्रशासन सापडले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन ‘नवीन नळजोड’ महिनाभर न देण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.
जूनमधील पावसाची आणि धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पुढील आदेश दिला जाईल, अशा सूचनाही पाणीपुरवठा विभागाने सर्व जलकेंद्राच्या प्रमुखांना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षात शहरात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकेला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून खडकवासला धरणातून दिवसाला १२५० ते १३०० एमएलडी पाणी घेतले जात होते . मात्र , हे पाणी आता दिवसाला १६०० ते २७०० एमएलडी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध
खडकवासलासह टेमघर, वरसगाव आणि पानशेत या धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 9.91 टक्के म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी दि. 4 मे पर्यंत हा साठा 40 टक्के होता. ग्रामीण भागासाठी उन्हाळी हंगामासाठी दि. 11 मार्चपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन दि. 10 मेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून यातून 6 टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर दि. 10 जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार आहे. या कालावधीत तीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सलग 90 दिवस खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्यात येणार आहे.