NCSL Boston 2025 : जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, भारतीय विधिमंडळातील १३० हून (NCSL Boston 2025 )अधिक सदस्यांचे एक शिष्टमंडळ ४ ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान अमेरिकेच्या बोस्टन शहरात होणार्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स (NCSL) समिटमध्ये सहभाग घेत आहे. या उपक्रमाची माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट चे डॉ. परिमल माया सुधाकर (एनएलसी भारत) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या ऐतिहासिक सहभागासाठी नॅशनल लिजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत (NLC भारत) या मंचाने पुढाकार घेतला असून, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत.
एनएलसी भारत हे भारतीय लोकप्रतिनिधींना सक्षम करणारे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विधिमंडळीय सहकार्य, संवाद व चांगल्या कार्यपद्धतींचे आदानप्रदान घडवून आणणारे एक अग्रगण्य व्यासपीठ आहे.
या शिष्टमंडळात देशभरातील २४ हून अधिक राज्यांमधून आलेले आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य (MLA व MLC) सहभागी असून, हे प्रतिनिधी २१ वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. हे शिष्टमंडळ भारताच्या समावेशक, लोकशाही आणि वैविध्यपूर्ण नेतृत्वाचे प्रतीक आहे.या उपक्रमाची सुरुवात २०२४ मध्ये, जेव्हा ५० लोकप्रतिनिधींनी लुईव्हिल, अमेरिका येथे झालेल्या विधिमंडळ परिषदेत सहभाग घेतला होता, अशा ऐतिहासिक प्रयत्नाने झाली. हा स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक वेगळा टप्पा होता, कारण अशा प्रकारची संकल्पना ना सरकारने घेतली होती ना इतर कोणत्याही संस्थेने.आता ही चळवळ अधिक बळकट होत, एकूण १३० लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन जगातील कोणत्याही परिषदेत भारतीय विधिमंडळाचे सर्वात मोठे प्रतिनिधित्व घडवून आणले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे – सीमापार ज्ञानविनिमय, विधिमंडळीय कार्यक्षमता वाढवणे, तसेच शासन व कायदेप्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्तम पद्धतींचा थेट अनुभव घेणे.
गेल्या दोन दिवसांमध्ये शिष्टमंडळाने अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांत सहभाग घेतला. बोस्टन कन्वेन्शन अॅण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या जनरल सेशनमध्ये त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर आरोग्य सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि वाहतूक व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील सत्रांमध्येही सहभाग घेतला. यानंतर त्यांनी मॅसेच्युसेट्स स्टेट हाऊसला शैक्षणिक भेट दिली, ज्यामध्ये तेथील विधानप्रक्रिया व इतिहास याचा अभ्यास करण्यात आला. याच दौर्यात, छउडङ चे अध्यक्ष श्री. वेन हार्पर यांच्याशी झालेल्या औपचारिक संवादातून दोन्ही देशांतील संस्थात्मक संबंध अधिक दृढ झाले.
या दौर्यादरम्यान, शिष्टमंडळाने विविध राज्यांतील आणि इतर देशांतील विधिमंडळ सदस्यांशी उत्स्फूर्त संवाद साधला, ज्यातून आंतरराष्ट्रीय सहकार्य व परस्पर समजूत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुंबईत २०२३ मध्ये पार पडलेल्या एनएलसी भारतच्या पहिल्या परिषदेनंतर, हा दौरा निरपेक्ष, माहितीवर आधारित व पक्षभेदापलीकडचा लोकशाही संवाद वाढवण्यासाठी आखलेल्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या समिटमध्ये भारतीय लोकप्रतिनिधी २,००० हून अधिक अमेरिकी आणि ७,००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबत सहभागी होत आहेत. चर्चेचे विषय आहेत – कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रशासन, डिजिटल लोकशाही, सायबर सुरक्षा, मतदारांचा विश्वास आणि धोरणात्मक नवकल्पना.
एनएलसी भारतचे संस्थापक डॉ. राहुल कराड म्हणाले, हे केवळ एक शिष्टमंडळ नाही, तर भारताच्या लोकशाही शक्तीचे आणि विविधतेतील एकतेचे जिवंत प्रतीक आहे. एवढ्या व्यापक प्रमाणावर आमदार व विधान परिषदेचे सदस्य आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच एकत्र आले आहेत. हे प्रतिनिधी जेव्हा या व्यासपीठावर पाऊल ठेवतात, तेव्हा केवळ वैयक्तिक आकांक्षा नाही, तर अब्जावधी नागरिकांची आशा आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे प्रतिनिधित्व ते करतात. आमचा हेतू साधा पण प्रभावी आहे – जगभरातील लोकशाहींच्या दरम्यान बंध निर्माण करणे, परस्पर शिकणे आणि उत्तम प्रशासनासाठी संवाद सुरू ठेवणे. या दौर्यात अमेरिकन विधिमंडळ व्यवस्थेवर आधारित शैक्षणिक सत्रे, स्थानिक संस्था व विधानसभांना भेटी, तसेच राजकारण, शिक्षण व उद्योग क्षेत्रातील भारतीय वंशाच्या नेतृत्वाशी संवाद यांचा समावेश आहे. या सहभागामागील प्रमुख उद्देश आहे जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींमध्ये अर्थपूर्ण संवाद घडवणे आणि भारतीय वंशीय समुदायांशी संबंध दृढ करणे.
बोस्टनमधील हे शिष्टमंडळ भारतीय लोकप्रतिनिधींसाठी नियोजित आंतरराष्ट्रीय अनुभववृद्धी कार्यक्रमांच्या मालिकेतील एक भाग आहे. येत्या काळात आशिया, युरोप आणि अमेरिका खंडांतील इतर देशांमध्ये अशा दौर्यांचे आयोजन होणार आहे. या सहकार्याधारित सहभागाच्या मॉडेलमधून एनएलसी भारतचे उद्दिष्ट आहे – एक सशक्त, माहितीपूर्ण, आणि जागतिक स्तरावर जोडलेले विधिमंडळीय वातावरण तयार करणे, जे भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकटी देईल आणि भारताला जागतिक लोकशाही नवोन्मेषाचा अग्रदूत म्हणून प्रतिष्ठा मिळवून देईल.