नेतृत्व विकासातून महिला सक्षमीकरणाचा आलेख वाढेल – माजी निवडणुक आयुक्त व्ही.एस. संपत 

357 0

महिलांमधील सुप्त गुण जागृत करून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे प्रचंड नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते विकसित केल्यास महिला सक्षमीकरणाचा आलेख वाढेल, असे विचार भारताचे माजी निवडणुक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी मांडले.

राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राजबाग लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या विश्‍वशांती घुमटात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

ही परिषद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णूतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने संपन्न झाली.
या वेळी राज्यसभेचे खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, उत्तरप्रदेशच्या माजी महिला कल्याण व बालविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) स्वाती सिंग सन्मानीय पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव मीता राजीवलोचन, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड आणि मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन हे उपस्थित होते.

व्ही.एस. संपत म्हणाले, महिलांना मतदानाच्या हक्काबाबत जागृत करण्याचे काम निवडणुक आयोगाच्या मार्फत केले जाते. भारत सरकारने महिलांसाठी आरक्षणाचे बील पास केले. त्यानंतर राजकारणात महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. आपल्या देशातील ५० टक्के महिलांचे प्रमाण आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करून त्यांच्यामध्ये आपल्या हक्कांची व कर्तव्याची जाणीव आणि जागृती करणे गरजेचे आहे.
डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, आज महिला डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, सिक्युरिटी आणि औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहेत. त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसीत करून त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आणण्याची गरज आहे.

मीता राजीवलोचन म्हणाल्या, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर आणि रमाबाई आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महिलांनी आपली वाटचाल करावी. आपल्या नवनवीन कल्पनांचा वापर करून आपली वाटचाल करावी. पारंपारिक मानसिकता बदलून समाजातील प्रश्‍न समजून ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा असेल.
स्वाती सिंग म्हणाल्या, सरकार महिलांच्या सबलीकरण आणि सशक्तिकरणासाठी मजबूत कायदे करीत आहेत. घरातील संस्कारीक दबावामुळे खेळणे, बोलणे आणि वाचणे याचेही स्वातंत्र्य महिलांना नाही. कारण आजही त्या परखडपणे बोलू शकत नाहीत. अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. संविधानाने महिलांचे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. परंतू प्रत्यक्षात वापरताना दिसत नाहीत. महिलांमध्ये नेतृत्व क्षमता मोठ्याप्रमाणावर आहे, ती वापरण्याची गरज आहे. स्त्री-पुरूष भेद मिटविण्यासाठी घरापासूनच आणि स्वतःपासून सुरूवात केल्यास समाजामध्ये मोठा बदल घडू शकेल.
राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा.पौर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गीरिसन यांनी आभार मानले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!