पुणे । पुण्यातील अमित लुंकड या बांधकाम व्यावसायिकाने बाजारभावापेक्षा अधिक दर महा दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले. मात्र गेल्या काही वर्षांपासून अमित लुंकड ते पैसे परत करत नसल्याच्या तक्रारी पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेकडे गुंतवणुकदारांकडून करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्या परंतु, गेले काही महिने त्यावर पोलिसांकडून केवळ तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमका काय तपास सुरु आहे हे असा प्रश्न गुंतवणूकदारांकडून उपस्थित करण्यात आल्या आहेत.
या तक्रारीबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, अमित लुंकड यांच्याविरुद्ध यापूर्वी तक्रारी आल्या होत्या. त्यातील काही जणांनी नंतर तक्रारी मागे घेतल्या आहेत. आता नव्याने पुन्हा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या सर्व एकत्र करुन त्याचा तपास करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये गुंतवणूकदारांनी अमित कांतीलाल लुंकड, अमोल कांतीलाल लुंकड आणि पुष्पा कांतीलाल लुंकड यांना प्रतिवादी केले आहे. याबाबत प्रविणचंद जैन यांनी सर्वप्रथम तक्रार दिली होती. लुंकड यांनी त्यांचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या ठेव व गुंतवणुक योजनाबाबत आश्वासित केले.अमित आणि अमोल लुंकड यांनी दरमहा दीड टक्का आणि सध्या मार्केटमध्ये असलेल्या दरापेक्षा अधिक परतावा देऊ, असे आश्वासन दिले. नियमित व्याज देऊ असे आश्वासित केले. त्यानंतर लुंकड रियाल्टीमध्ये प्रविणचंद जैन यांनी 6 कोटी 81 लाख रुपयांची गुंतवणुक केली. सुरुवातीला त्यांच्याकडून व्याज येत होते. परंतु, 2019 पासून व्याज देण्यास अनियमितता होऊ लागली. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत अपुरा निधी असल्याचे कारण देऊन ते धनादेश परत आले. त्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती.अशाच प्रकारे अनेकांनी आपली कोट्यावधींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे केल्या आहेत. खिंससरा चव्हाण यांची 26 कोटी 70 लाख 37 हजार 973 रुपये आणि अशोक रायसोनी यांची 8 कोटी 38 लाख 30 हजार 756 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह अनेक गुंतवणूक दारांनी तक्रारी केल्या आहेत.मात्र तरीही आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास अतिशय संथगतीने सुरु आहे. अनेक तक्रारदारांना अजून गुन्हे शाखेन बोलवून त्यांचे म्हणणेही नोंदवून घेतले नाही असा आरोप गुंतवणुकदारांकडून करण्यात आला आहे.