राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, कोल्हापूर आणि नागपूर नंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येही पावसाने थैमान घातले आहे. दोन-तीन दिवसांपासून पुण्यात सलग मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच पुणे शहराचे मुख्य धरण असलेले खडकवासला धरण 100% भरल्यामुळे धरणातून कालपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रांमधील गावे, वस्त्या, सोसायट्या आणि रस्त्यांवर पाणी शिरले आहे. अनेक नागरिक या पाण्यामध्ये अडकून पडल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र अशीच एक दुर्दैवी घटना पुण्यातील वारजे परिसरात घडली.
वारजेतील स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत गोठ्यात काही जनावरे बांधली होती. रात्री अचानक पावसाचा जोर वाढला आणि विसर्ग सुरू असल्यामुळे नदीपात्रातील पाणी वाढले. ज्यामुळे मध्यरात्रीत हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला होता. या गोठ्यात तब्बल 14 जनावरे बांधली होती. पाणी वाढल्यामुळे ही जनावरे पाण्यात बुडली ज्यामुळे त्यांचा श्वास गुदमरला व या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात 11 गाईंचा समावेश आहे. तर चार ते पाच जनावरे पाण्याच्या वर तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककाळा पसरली आहे.