पुणे । आधुनिक काळात युद्धपद्धती बदलली आहे. प्रत्येक नागरिकाला आता योद्धा म्हणून काम करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रीय हितास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे असे आवाहन सरंक्षण मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांनी केले. अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित कॉम्प्रेहेन्सिव्ह नॅशनल सिक्युरिटी विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्कराचे उदाहरण देऊन लेफ्टनंट जनरल खंडारे म्हणाले, शिवाजी महाराजांचे लष्कर शेतकऱ्यांचे होते, खडे सैन्य नव्हते. शेती करत असतानाच युध्दाचाही सर्व कला जायचा, यासाठी प्रत्येक गावात आखाडे होते. युद्धाचा प्रसंग आल्यावर ते स्वतःहून सैन्यात सहभागी व्हायचे. त्यामुळेच महाराजांनी मोगलांच्या बलाढ्य सेनेचा पराभव केला.
सध्याची युद्धपद्धती बदलत आहे. इन्फॉर्मेशन किंवा डिसइन्फॉर्मेशन देऊन नागरिकांचा बुद्धिभेद केला जाऊ शकतो. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. त्या माध्यमातून चुकीची माहिती पोहोचविली जाऊ शकते. हे प्रकार रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रहिताच्या विरोधात एखादा मेसेज आल्यावर आंधळेपणाने पुढे पाठविण्याऐवजी कोणी पाठविला आहे त्याला जाब विचारायला हवा, असे आवाहन लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांनी केले. संपूर्ण जग कौटिल्याच्या अर्थशात्राचा अभ्यास करत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष केले अशी खंत व्यक्त करत लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे म्हणाले, साम , दाम , भेद आणि दंड ही निती लक्षात ठेवायला हवी. शिवाजी महाराजांनी त्याचा अभ्यास केला होता. बहिर्जी नाईक यांच्यासारखे गुप्तहेर त्यांच्याकडे होते, त्यामुळॆच सुरतेची लूट असो की आग्र्याहून सुटकेचे नियोजन करणे त्यांना सोपे झाले. विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्वागत केले. अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या लॉ आणि लिबरल आर्ट विभागाचे डीन डॉ. सनी थॉमस यांनी प्रास्तविक केले. प्रा. केदार कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. केदार नाईक यांनी आभार मानले.