BHOR POLICE CASE: लग्नात "जात" आडवी आली अन् अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या

BHOR POLICE CASE: लग्नात “जात” आडवी आली अन् अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या

1003 0

जातीभेदाचे बंधन तोडून पुरोगामी महाराष्ट्र प्रगती करतोय, असं एकदम म्हटलं जातं. मात्र याच पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यामुळे पुण्यातल्या भोरमध्ये (BHOR POLICE CASE) स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विक्रम गायकवाडला (vikram gaikwad) आपला जीव गमावावा लागलाय. आणि ऑनर किलिंगचं (HONOR KILLING)हे प्रकरण जाणून-बुजून दाबण्यात आल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाच्या विरोधात सामाजिक चळवळीतील लोक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

विक्रम गायकवाड, हा 28 वर्षीय तरुण मूळचा भोर तालुक्यातील होता. तो पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. या दरम्यान त्याची ओळख 26 वर्षीय स्नेहा चव्हाण या मुलीशी झाली. स्नेहा मुळशी साताऱ्याची असून ती देखील एमपीएससी करत होती. दोघांचंही प्रेम असल्याने या दोघांनी सप्टेंबर 2024 मध्ये घरच्यांच्या परस्पर लग्न केलं. लग्न केल्यानंतरही हे दोघे एकत्र राहत नव्हते. मात्र 2 फेब्रुवारी 2025 ला या दोघांच्या घरी मॅरेज सर्टिफिकेट पोहोचलं. त्यावेळी मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट कळाली. त्यानंतर त्यांनी मुलीवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकला. मुलगी ऐकत नव्हती त्यामुळे मुलीचे कुटुंबीय थेट विक्रमच्या गावी पोहोचले. तंटामुक्ती अभियानाच्या प्रमुखाला भेटून विक्रमवर सोडचिट्टी देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र विक्रम आणि स्नेहा हे दोघेही लग्न मोडायला तयार नव्हते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी विक्रमला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. विशेष स्थानिक पोलिसांना कळविण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी विक्रमची हत्या करण्यात आली. ही हत्या एक प्लॅनड मर्डर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गुन्हा इतका गंभीर असूनही पोलीस या प्रकरणाचा समाधानकारक तपास करत नसल्याचा आरोप विक्रमच्या आईने केला आहे. त्याचबरोबर विक्रमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

प्रेमाला न्याय मिळणार का ? 

काही दिवसांपूर्वी लातूरच्या माऊली सोट या तरुणाची प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये अमित साळुंखे या तरुणाचा ही आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी खून केला. ऑनर किलिंगच्या या घटना ताज्या असतानाच पुण्यातील भोरमध्ये विक्रम गायकवाड ची झालेली घटना ही पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्राला सुन्न करणारी आहे. या प्रकरणातील नवविवाहित स्नेहा हिची पीएसआय पदासाठी निवड झाली होती, तर विक्रम हा देखील अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करत होता. दोघेही अधिकारी झाल्यानंतर सुखाचा संसार होईल अशी स्वप्न या दोघांनी पाहिली होती. मात्र विक्रमच्या हत्येनं केवळ विक्रम आणि त्याच्या कुटुंबीयांचंच नव्हे तर पोलीस अधिकारी होऊ घातलेल्या स्नेहाचंही आयुष्य उध्वस्त झालं. त्यामुळे विक्रमच्या प्रेमाला न्याय मिळणार का हाच प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!