तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ही कॉलर ट्यून ऐकली असेल. पण सहाजिकच त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं नसेल. मात्र ही कॉलर ट्यून भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी सध्या महत्त्वाची आहे. का ? कारण पुण्यासह राज्यभरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. आणि याच फायबर चोरांपासून सतर्कतेचा इशारा देण्यासाठी गृहमंत्रालयाने ही कॉलर ट्यून जारी केली आहे. आणि सायबर चोरांच्या जाळ्यात सर्वाधिक अडकले ते पुणेकर…. कसे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून..
सध्या हे सायबर चोर वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, डिजिटल पेमेंट ॲप आणि थेट बँक अकाउंटपर्यंत पोहोचत आहेत. या चोरांकडून कधी कॉल, मेसेज, whatsapp मेसेज, व्हिडिओ कॉल, ई-मेल तर कधी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट टाकली जाते. अनोळखी लिंक पाठवली जाते. आणि या चोरांकडून आपल्याला करण्यात आलेल्या संपर्काला आपण प्रतिसाद देताच बँक अकाउंट रिकामं होतं. गेल्या वर्षभरात पुणेकरांच्या तब्बल 1161 कोटी रुपयांवर सायबर चोरांनी डल्ला मारला. यामध्ये पुणे शहरात सायबर फ्रॉडच्या एकूण 38 हजार तक्रारी आल्या त्यामधून तब्बल 669 कोटी रुपये चोरण्यात आले. तर पिंपरी चिंचवड मध्ये 27 हजार तक्रारींमधून 429 करोड रुपयांचा फ्रॉड करण्यात आला. तर पुणे ग्रामीणच्या नागरिकांचीही तब्बल 64 कोटींची फसवणूक झाली आहे. हजारो कोटींचा हा फ्रॉड केवळ पुणे जिल्ह्यात झालाय. याविषयीची सविस्तर माहिती सायबर पोलीस ठाण्यातील पाेलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली.
राज्यात आणि देशातील निष्पाप नागरिकांचे लाखो कोटी रुपये या सायबर चोरांनी उकळलेत. त्यामुळेच या चोरांपासून वाचण्यासाठी सरकारकडून कॉलर ट्यून च्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय.
वीस रुपयांची कोथिंबीरीची जुडी घेतानाही दोन रुपये कमी करा म्हणणारे आणि पैसे परत घेताना कायम दोनदा मोजून घेणारे आपण भारतीय… या सायबर चोरांच्या जाळ्यात नेमके कसे अडकतो ? या सायबर चोरांचा पॅटर्न काय हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
अमिष किंवा भीती दाखवणं सायबर चोरांचा ठरलेला पॅटर्न आहे. कधी मोठ्या पगाराची नोकरी लावून देऊ, शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला नफा देऊ, कधी कमी व्याज दराने कर्ज देऊ तर कधी तुम्हाला लॉटरी लागली आहे, असं या चोरांकडून सांगितलं जातं. तर काही वेळा तुमच्या नावे परदेशातून पार्सल आलंय ज्यामध्ये ड्रग्स सापडलेत, तुमचे न्यूड व्हिडिओ किंवा फोटो आमच्याकडे आहेत, तर कधी तुमचं बँक अकाउंट फ्रिज होणार आहे, अशी भीती दाखवली जाते, आणि याच आमिषाला किंवा भीतीला बळी पडून अनेक जण आपल्या बँक अकाउंटशी संबंधित ओटीपी, सी व्ही व्ही, अकाउंट डिटेल चोरांना देतात आणि आर्थिक फसवणुकीचे बळी ठरतात
त्यामुळेच अनोळखी नंबर वरून संपर्क साधला गेल्यास सावधानतापूर्वक पावलं उचलणं गरजेचं आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत डिजिटल अरेस्ट चे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने सायबर चोर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आल्यास तात्काळ सायबर पोलिसात धाव घ्यावी. असा आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.