पुणे- ग्रामपंचायतीपेक्षा अधिक रक्कमेच्या अन्यायकारक मिळकत कर तसेच पाणी टंचाई व इतर सुविधां अभावी ३४ गावांतील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. अन्यायकारक मिळकत कर कमी करावा असे साकडे सर्वपक्षीय हवेली तालुका हवेली कृती समितीने महापालिका प्रशासनाला घातले आहे. तातडीने दखल न घेतल्यास जन आंदोलनाचा इशाराही समितीने दिला आहे.
माजी विरोधीपक्ष नेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखालील समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, पोपटराव खेडेकर, संतोष ताठे आदी पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे कर संकलन प्रमुख देशमुख यांची भेट घेतली. त्यांना पालिका प्रशासनाने नव्याने समाविष्ट केलेल्या ३४ गावात मिळकतकरांची अन्यायकारक आकारणीची माहिती दिली. ग्रामपंचायत करापेक्षा तीन ते पाच पट अधिक करआकारणी केली आहे.
या गावात अद्याप पालिकेने पाणी, रस्ते ,आरोग्य अशा मुलभूत सुविधा पुरविल्या नाहीत. मिळकत कोणत्या भागात आहे. त्यानुसार कर आकारणी केली नाही. सुविधा न देता भरमसाठ कराची वसुली केली जात आहे. कराच्या वसुलीसाठी वांरवार नोटीसा दिल्या जात आहेत. भरमसाठ करांमुळे अनेकांवर मिळकती विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
कृती समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, “कायद्यानुसार जोपर्यंत शहराच्या दर्जाच्या सुविधा नागरिकांना मिळत नाही तोपर्यंत शहराप्रमाणे मिळकत कर घेण्याचा अधिकार पालिकेला नाही. असे असताना भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करून पालिका अन्यायकारकपणे कर वसुली करत आहे. शहराच्या मध्यभागा प्रमाणे १०-१५ किलोमीटर दूर असलेल्या समाविष्ट गावात सरसकट मिळकतकरांची आकारणी केली आहे”
अन्यायकारक कराबाबत मुख्य सभेमध्ये मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी व भरमसाट जाचक करातून नागरिकांची सुटका करावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.