जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.
पुण्यातील वेल्हा तालुक्यात ही आगीची घटना घडली आहे. जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने ट्रकमधील चाऱ्याने पेट घेतला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत चारा लाकडाच्या साहाय्याने रस्त्यावर काढला. त्यामुळे ट्रक वाचविण्यात त्यांना यश आले, मात्र यात जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे. चार शेतकऱ्यांचा हा चारा होता. या चाऱ्याने वाहन भरले होते. त्यामुळे अतिरिक्त वजन असलेल्या या वाहनाचा विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि त्यातच ही आग लागली. चारा असल्यामुळे लवकर आग पसरली. चाऱ्याने पेट घेतल्याने वेल्हा-नसरापूर मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.