राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरकस चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे. हे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि असदुद्दीन औवैसी यांचा एमआयएम. होय, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ही ऑफर दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्वत: खासदार जलील यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या भेटीत ही ऑफर दिल्याचेही जलील यांनी म्हटले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, माझ्या आईचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आले होते. त्यावेळी आमची विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी आम्ही त्यांना ऑफर दिली की, देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या. आमच्या ऑफरवर राजेश टोपे काहीच बोलले नाहीत, असेही जलील यांनी सांगितले. दरम्यान, आमच्यावर (एमआयएम) भाजपची बी टीम असल्याची नेहमीच टीका होते. आम्हाला ही टीका मान्य नाही. आम्ही थेट ऑफर देतो आम्ही तुमच्यासोबतही युती करायला तयार आहोत. आमच्यासोबत या. पण खरे सांगायचे तर प्रत्येकाला फक्त मुस्लिम मते आवश्यक आहेत. बाकी काही नको. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे, असेही जलील म्हणाले.