बीड जिल्हा नियोजन समितीत काय घडलं ? कोण कोणाला भिडलं?
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. अजित पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र पाहायला मिळाले. या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.
खासदार बजरंग सोनवणे यांनी माजी पालकमंत्र्यांशी दहशत असा उल्लेख केला आणि त्यावरून वाद सुरू झाला. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आवाजा कंपनी खंडणी प्रकरण अशा प्रकरणावर आणि गुन्हेगारीवर या बैठकीत चर्चा सुरू होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, बीडची बदनामी होत आहे. त्यात बजरंग सोनवणे यांनी आधीच दहशतीचा मुद्दा उपस्थित केला होता. अशात बीडच्या बदनामीचा उल्लेख आला त्यावर सुरेश धस यांनी आक्षेप घेत ते बैठकीतच उठले. बीडची बदनामी कोणी केली असा थेट प्रश्न त्यांनी धनंजय मुंडे यांना विचारला.दरम्यान यावेळी अजित पवार यांनी मध्यस्थ केली आणि त्यानंतर ही बैठक संपली. दरम्यान या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार सुरेश धस म्हणाले की ही बाचाबाची किरकोळ होती त्याला बाचाबाची म्हणता येणार नाही आमचं भांडण गुद्द्याचं नाही तर मुद्द्याचं आहे. असंही सुरेश धस म्हणाले.
