सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अनेक नेत्यांकडून टीका केली जात आहे. अशीच टीका आमदार उत्तमराव जानकर (MLA Uttamrao Jankar) यांनी देखील केली असून मुंडेंचे ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील CCTV फुटेज बाहेर काढा, संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर म्हणाले.
उत्तमराव जानकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख हत्या प्रकरणा नंतर बीडमध्ये निर्माण झालेलं दहशतीचे वातावरण आणि धनंजय मुंडे यांच्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘बीड जिल्ह्यात गुंडगिरी वाढली आहे, अराजकता निर्माण झाली आहे. अराजकता निर्माण करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्याशिवाय गुंड तयार होत नाही. राजकारणी लोक जाणीवपूर्वक गुंडाना पोसतात आणि जनतेमध्ये भीती निर्माण करतात. वाल्याकोळ्याने कुणासाठी रांजन भरला, हे राज्याला माहित आहे. त्यामुळं या गुंडांना पोसणाऱ्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे.’
मुंडेंच्या राजनाम्यावर मोठं विधान
धनंजय मुंडे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना देखील मुंडेंचा राजीनामा सत्ताधारी पक्षांकडून मागितला जात नाही, याविषयी बोलताना जानकर म्हणाले, ‘ज्या दिवशी या प्रकरणात इतके आरोप झाले, त्याच दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी अजूनही राजीनामा दिला नाही. अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे होताय. मात्र, त्यांनीही राजीनामा मागितला नाही. आधी असं राजकारण नव्हतं. पूर्वी नुसते आरोप झाले तरी राजीनामे दिले जायचे. आर आर आबा, अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा.’ पुढे बोलताना उत्तमराव जानकर यांनी संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, अशी मागणी देखील केली.