मुंबई : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (DATTA SALAVI) यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘ जय महाराष्ट्र ‘ करून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या पक्षात प्रवेश करून पुन्हा धनुष्यबाण हाती घेतला. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या काळात दत्ता दळवी हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे होते. मात्र, आता त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची पुढील राजकीय वाटचाल होणार आहे.
मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दत्ता दळवी हे टाकरे गटात शिवसेनेचे उपनेते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख होते. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. ते सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून मुंबई मनपात निवडून गेले. त्यांनी 2005 ते 2007 या काळात मुंबईचे महापौरपदही भूषवले. ईशान्य मुंबईत त्यांचा दबदबा आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण पक्षातील पदांचा राजीनामा देत असल्याचे दळवी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या
बंडावेळी दळवींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे त्यांना अटक झाली होती. मात्र, तरीही दळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.