मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत ही भेट झाल्याचीही चर्चा आहे.
उदय सामंत यांनी सकाळी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत उभय नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यातून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. मात्र, या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसून ही निव्वळ सदिच्छा भेट असल्याचा दावा केला जात आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी मनसेला महायुतीत घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे मनसे व शिवसेनेत मतभेद निर्माण झाले होते. मात्र, आगामी महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना मनसेची साथ घेण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. त्यासाठीच उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीतून मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व मनसेची युती बघायला मिळणार असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तब्बल ८ उमेदवार पराभूत झाले होते. महापालिका निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेला फटका बसू नये, याची काळजी म्हणून सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.