मुंबई : चंद्र कुठे आहे, ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
शिंदे हे सध्या त्यांच्या दरे या गावी आहेत. ते शेती करताना दिसून आले आहेत. त्याबद्दल चिमटा काढताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मला वाटतंय त्यांनी गावातील मुक्काम वाढवला आहे. तापमान वाढल्यामुळे चंद्र कुठे आहे, ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेविषयी ते म्हणाले की, साद प्रतिसाद आहे पण वाद नाही. दोन पक्षप्रमुख बोलल्यानंतर आता त्यावर कार्यकर्त्यांनी बोलायची गरज नाही. रस्ते व नालेसफाईच्या मुद्यावर आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. नालेसफाई अजून झालेली नाही, पण तिजोरीची सफाई मात्र, झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. पोईसर नदीचा फोटो समोर आला आहे. मिठी नदी सुद्धा अस्वच्छ आहे, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी या संदर्भात बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.