महाराष्ट्रात काँग्रेसची बिकट परिस्थिती आहे. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. कोणी सत्येच्या हव्यासापोटी तर कोणी ईडी, सीबीआय अशा तपास यंत्रणांच्या भीतीपोटी पक्ष प्रवेश केले आहेत. प्रत्येकाचं काँग्रेसला सोडून जाण्याचं कारण वेगळं आहे. काँग्रेसने संघटन बांधणीसाठी, पक्षाला नव्याने उभारी मिळण्यासाठी कोरी पाटी असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र काँग्रेसला पक्षगळतीचं लागलेलं ग्रहण काही थांबत नाही.काँग्रेसमध्ये पक्षगळती ही सुरूच आहे. अहिल्यानगरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. आज रविवारी (दि. 23) काळे यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या प्रवेशानंतर अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाची मशाल ज्योत फिरवणार असल्याचं किरण काळे यांनी म्हटलं आहे.
काळे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरून गर्जना केली त्याच मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय. अनेक लोक सत्तेसाठी पक्षातून बाहेर पडतायत. आम्ही अहिल्यानगर येथून आलोय आणि अत्यंत खुश आहोत. पण आम्ही कोणत्याही निवडणूक समोर नसताना संघर्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. पडत्या काळात शिवसेनेमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढणार आहोत. हा प्रवेश करण्यामागे काही कारणे आहेत. स्थानिक पातळीवर राजकारण आहे, ते महत्त्वाचं आहे. काही लोक हिंदुत्वाचा विषय चुकीच्या पद्धतीने पुढे नेत आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या प्रतिमा शिवजयंतीच्या रॅलीत पाहिल्या, हे आम्ही सहन करणार नाही. अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाची मशाल ज्योत फिरवणार असल्याचं किरण काळे म्हणाले. आम्ही कोणावरच नाराज नाही, नाराजीतून हा प्रवेश नाही. आव्हानात्मक परिस्थिती असताना आम्ही पडत्या काळात साथ देण्यासाठी हा विडा उचलला आहे. शिवसेना अहिल्यानगरमध्ये बळकट करण्याचे काम आम्ही करत आहोत. सर्व महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे की, खरं हिंदुत्व मातोश्रीवर आहे. काही लोक बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून वावरत आहेत. पण, त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत, असंही किरण काळे म्हणाले.