‘उठावात श्रीनिवास माझ्याबरोबर होता, त्यांचं कल्याण होईल’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान

174 0

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांमध्ये आणि युती आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. हा तिढा सोडवता सोडवता वरिष्ठांच्या तोंडच पाणी पळालं. अगदी शेवटच्या दिवशी पर्यंत अनेक उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र ज्यावेळी ही सर्व नावं जाहीर झाली त्यानंतर इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. यात सगळ्या नाराजीच्या खेळात सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा… याच वनगा यांचं नाव घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कधी कधी आपल्याला थांबावं लागतं’, असं भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कधी कधी आपल्याला थांबावं लागतं. त्यामध्ये काही गणितं असतात. परंतु त्याच्यातूनही काहीतरी चांगलं घडणार असतं. मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. मी पक्षातील काही लोकांना लोकसभेला उमेदवारी देऊ शकलो नाही, पण त्यांना मी ताबडतोब विधान परिषद सदस्य बनवलं, आमदार बनवलं हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी श्रीनिवास माझ्या सोबतच होता. मला त्याने कधीच काहीही विचारलं नाही. त्याच्या मुलाचा वाढदिवस देखील त्यानं बाजूला ठेवला. आम्ही त्याच मार्गाने सरळ पुढे गेलो, असा हा श्रीनिवास उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी व्यासपीठावर आला आहे. श्रीनिवास यांचं सगळं चांगलं होणार आहे, त्यांचं कल्याण होणार आहे. त्याला कुठेही काहीही बघण्याची गरज लागणार नाही.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात श्रीनिवास वनगा यांच्यावर थेटपणे भाष्य करत जरी विधानसभेचे उमेदवारी मिळाली नसली तरीही त्यांना इतर पद दिलं जाईल असं अप्रत्यक्षरीत्या सांगितलं. अशाच पद्धतीने शिंदे गटाने इच्छुक उमेदवारांची समजूत काढल्याने शिंदेगटात नाराजांची आणि बंडखोरांची संख्या ही तुलनेने कमी आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!