मुंबई : महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यास हिंदू समाजात फूट पडेल, अशी भीती व्यक्त करतानाच सरकारच्या या निर्णयाला चाप बसवा, अशी विनंती मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांना पत्र पाठवून केली आहे. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या प्रयत्नातून
हिंदू समाज एकत्र येण्याऐवजी तो आणखी विखुरण्याची शक्यता असल्याचे देशपांडे यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि ही संघटना विचारांच्या आधारावर उभी आहे. म्हणूनच हे सांगण्याचे आम्ही धाडस करत आहोत. हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप बसवाल, हा आमचा ठाम विश्वास आहे, असेही या पत्रात नमूद आहे.
संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात
मराठ्यांच्या इतिहासाचे दाखले दिले आहेत. मराठ्यांनी सुमारे २०० वर्ष बहुतांश भारतावर राज्य केले, पण कधीही मराठी भाषा त्या प्रांतांवर लादली नाही. इंग्रजांनी हिंदुस्थान मोघलांकडून नाही तर मराठ्यांकडून जिंकला. शिंदे ग्वालियरमध्ये, गायकवाड बडोद्यामध्ये, दक्षिणेत तंजावर येथे मराठ्यांचे राज्य होते. मात्र, मराठ्यांना त्यावेळी देखील मराठी संपर्काची भाषा करावीशी वाटली नाही. उलटपक्षी शिंदे हे ग्वाल्हेर येथे जाऊन सिंधिया झाल्याचा उल्लेख देशपांडे यांनी पत्रात केला आहे.
मराठी माणूस हा सहिष्णू आहे. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. मराठी तसेच गुजराती, तामीळ बोलणारा माणूस सुद्धा हिंदूच आहे. ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी तामिळ, मल्याळम, कोंकणी ही बोलीभाषा आत्मसात करण्यात आली. हे सर्व सांगण्याचे कारण एकच आहे की, धर्म वाढवायचा असेल टिकवायचा असेल तर सर्व भाषांना सामावून घेणे गरजेचे आहे. एका समूहाची भाषा दुसऱ्या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही. पाकिस्तानात बंगाली बोलणाऱ्या मुसलमानांनी भाषेच्या आधारावर स्वतंत्र राष्ट्र घेतले, हा इतिहास ताजा असल्याचे देशपांडे यांनी लक्षात आणून दिले आहे. हिंदी सक्तीचा सरकारचा निर्णय रोखण्यासाठी संघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही देशपांडे यांनी पत्रातून केले आहे.