Samajwadi पक्षाच्या 07 ‘सायकली’ पंक्चर! 02 सायकलस्वार विधानसभेत!

437 0

2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाची (Samajwadi Party) ‘सायकल’ (bicycle)अशी काही जोरात धावली की, या पक्षाच्या 37 सायकलस्वारांनी थेट दिल्लीच गाठली. या निकालाच्या पार्श्वभूमीवर, ‘यूपी में हुई जीत हमारी, अब है महाराष्ट्र की बारी,’ असा नारा देत समाजवादी पक्षानं आपल्याकडील सायकलींची ‘सर्व्हिसिंग’ करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत 09 सायकलस्वार उतरवले. मात्र, त्यातल्या 07 सायकली ‘पंक्चर’ झाल्या, तर 02 सायकलस्वारांनी विधानसभा गाठली.

2024 : ‘सप’च्या 09 पैकी 07 ‘सायकली’ पंक्चर!

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानं
2024 च्या निवडणुकीत आघाडीकडं रावेर, अमरावती, मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, भिवंडी मध्य, मालेगाव मध्य, भायखळा, वर्सोवा, धुळे शहर, औरंगाबाद पूर्व, अणुशक्तीनगर आणि कारंजा अशा 12 मतदारसंघांची मागणी केली होती. मात्र, आघाडीनं ‘सप’ची ही मागणी काही पूर्ण केली नाही. अखेर आघाडीच्या खात्यातून ‘सप’ च्या वाट्याला मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या अवघ्या 02 जागा आल्या. ‘सप’नं या 02 जागांसह भिवंडी पश्चिम, धुळे शहर, भायखळा, औरंगाबाद पूर्व, मालेगाव मध्य, परांडा आणि तुळजापूर या 07 जागा स्वबळावर लढवल्या. मात्र, 09 पैकी 07 ‘सायकली’ पंक्चर झाल्या. मानखुर्द शिवाजीनगरमधून पुन्हा एकदा निवडून येत अबु आझमी यांनी विजयाचा चौकार मारला, तर भिवंडी पूर्वमधून रईस शेख दुसऱ्यांदा निवडून आले. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला एकूण 2 लाख 47 हजार 350 मतं मिळाली. महाराष्ट्रात ‘सप’ ची ताकद किती हे पाहण्यासाठी 1995 ते 2019 या निवडणुकांमध्ये पक्षाची काय स्थिती होती हे समजून घ्यावं लागेल.

1995 : ‘सप’च्या 03 सायकलस्वारांनी गाठली विधानसभा!

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायमसिंह यादव यांनी 1992 रोजी समाजवादी पक्षा (सप) ची स्थापना केली. त्यानंतर ‘सप’नं पहिल्यांदाच 1995 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली. 22 उमेदवारांनी ‘सायकल’वर टांग मारत शर्यतीत भाग घेतला. त्यापैकी 03 जणांनी ही शर्यत जिंकली. मोहम्मद खान (भिवंडी), सुहेल लोखंडवाला (नागपाडा) आणि बशीर पटेल (उमरखाडी) हे तिघे जण पहिल्यांदाच आमदार बनले, तर नवाब मलिक यांचा नेहरूनगर मतदारसंघात पराभव झाला.

1999 : ‘सप’चे 02 उमेदवार बनले आमदार!

1999 ला ‘सप’नं 15 जागा लढवल्या. त्यापैकी 02 जण निवडून आले. नेहरूनगरमधून नवाब मलिक, तर उमरखाडी येथून पुन्हा एकदा बशीर पटेल यांनी बाजी मारली.

2004 :अबु आझमींची ‘सायकल’ पहिल्याच शर्यतीत ‘पंक्चर’!

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे मुखिया (प्रदेशाध्यक्ष) अबु आझमी (abu azami)
2002 ला राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागली. ‘सप’नं आझमी यांच्या नेतृत्वात तब्बल 95 जागा लढवल्या पण सगळ्यांच्या सायकली ‘पंक्चर’ झाल्या. अबू आझमींचाही तत्कालीन भिवंडी मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर 2008 पर्यंत आझमी राज्यसभा खासदार राहिले.

‘सप’च्या ‘सायकल’नं MVA चा ट्रॅक सोडला; समाजवादी पक्ष आघाडीतून बाहेर!

2009 : अबु आझमी दोन जागी लढले, दोन्ही जागा जिंकले!

2009 च्या विधानसभा निवडणुकीत ‘सप’नं यावेळी 31 जागा लढवल्या. अबु आझमी यांनी नव्यानं पुनर्रचना झालेल्या मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या दोन मतदारसंघांत एकाच वेळी निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी विजयी झाले. त्यांच्यासह भिवंडी पश्चिममधून अब्दुल मोमीन आणि नवापूर
(जि. नंदुरबार) येथून शरद गावितही आमदार बनले. या निवडणुकीत ‘सप’नं 04 जागा जिंकल्या. 1995 ते 2019 अखेर ‘सप’नं जिंकलेल्या जागांचा हा सर्वाधिक आकडा आहे. या निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांनी ‘सप’ची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ‘सायकल’वरून खाली उतरत हाती ‘घड्याळ’ बांधलेले नवाब मलिक या निवडणुकीत अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार बनले.

2014:एकटे अबु आझमी ‘सायकल’वरून पुन्हा विधानसभेत!

2014 च्या निवडणुकीत ‘सप’नं 22 जागा लढवल्या पण त्यांचा एकच उमेदवार निवडून आला आणि ते म्हणजे अबु आझमी!

आझमी यांनी 2009 च्या निवडणुकीचा पॅटर्न पुन्हा एकदा 2014 च्या निवडणुकीत राबवला. ते एकाच वेळी मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या दोन मतदारसंघांत उभे राहिले. मात्र, यावेळी त्यांना मानखुर्द शिवाजीनगरमध्ये विजय मिळाला, तर भिवंडी पूर्वमध्ये हार पत्करावी लागली. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढून पाहिली पण काँग्रेसच्या गुरूदास कामत यांनी त्यांचा भिवंडी लोकसभा मतदारसंघात पराभव केला.

2019:अबु आझमी ‘सायकल’वरून तिसऱ्यांदा विधानसभेत !

2019 च्या निवडणुकीत ‘सप’नं 07 जागा लढवल्या. त्यापैकी 02 जागा जिंकल्या. मानखुर्द शिवाजीनगरमधून अबु आझमी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत आमदारकीची हॅटट्रिक साधली तर भिवंडी पूर्वमधून रईस शेख आमदार बनले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ‘सप’नं 07 जागांची मागणी करूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं फक्त मानखुर्द शिवाजी नगर, भिवंडी आणि औरंगाबाद पूर्व या 03 जागा देऊ केल्या होत्या. अखेर आघाडीत न सामील होता ‘सप’नं 07 जागांवर निवडणूक लढवली.

एकूणच काय, तर लोकसभेतील एकूण खासदारांची संख्या पाहाता भाजप आणि काँग्रेसनंतर समाजवादी पक्ष हा देशातील तिसरा सर्वांत मोठा पक्ष ठरलाय खरा; पण उत्तर प्रदेशात ज्या प्रमाणात समाजवादी पक्षाला लोकसभेत यश मिळालं तसं यश महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळवता आलं नाही. भविष्यात, समाजवादी पक्षाला महाराष्ट्राची विधानसभा गाठण्यासाठीचा खडतर मार्ग पार करायचा असेल तर आपल्या सायकली अधिक मजबूत करून त्या आणखी जोरात पळवाव्या लागतील, हे नक्की!

Share This News
error: Content is protected !!