मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पोस्टवरून सध्या राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्यावर नेहमी टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी मात्र याबाबत त्यांनी पत्रक काढून केतकीच्या पोस्टवर तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही असे ठणकावून केतकी चितळेला कडक शब्दात समज दिली आहे.
राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही.त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिन किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो, तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे, असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! pic.twitter.com/hnngbIwQaW
— Raj Thackeray (@RajThackeray) May 14, 2022
पवार साहेबांवर लिहिलेले शब्द तोंडातूनही निघत नाहीत- जितेंद्र आव्हाड
पवारसाहेबांवर अनेकवेळा टीका झाली. तेव्हा आम्ही बोललो. मात्र शरद पवार यांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं आणि नरक मिळावा अशी प्रार्थना करणे एका स्त्रीला शोभण्यासारखे नाही. स्त्री ही मातेसमान असते. पवारांबाबत जे भयंकर लिहिल आहे, ते शब्द तोंडातून निघतही नाहीत. असं का लिहावं वाटतं हा संशोधनाचा विषय आहे. इतिहासात या भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही टीका केली होती. आम्ही पहिल्याच फटक्यात गांभीर्याने घेत नाही. लोक मला सांगत आहेत की कशाला गांभीर्यान घेता. वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरणारा तुमचा बाप, त्याच्यावर चालून जाणारी विकृती कुणी असेल तर त्यांना रोखायला हवं. नाहीतर अशी वाढत जाणारी विषवल्ली जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढतच जाणार. त्यामुळे हे विष संपवलं नाही तर ते समाजाला संपवून टाकेल.
केतकीचे मानसिक संतुलन बिघडले आहे- रुपाली पाटील
केतकीचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि जरी मानसिक संतुलन बिघडले असले तरी ती अन्ना ऐवजी शेण खात नाही. तिने ज्यांच्यावर टीका केली आहे ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही तर राजकारणातील आताचे जेष्ट आणि ज्यांच्या पिढ्या न् पिढ्या राजकारणात आहेत अशांचे मार्गदर्शत आदरणीय शरद पवार आहेत. केतकीचे वय काय, आपण कोणा विषयी बोलतोय. टीका करताना ब्राम्हण, मराठा, हिंदू मुस्लीम या गोष्टी आणायच्या आणि मन की बात बोलून समाजाचे स्वास्थ बिघडवण्याचे काम केले जात आहे.