लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील 103 शेतकऱ्यांना राज्य वक्फ बोर्डाने (waqf board )नोटीस बजावल्या आहेत. या गावातील मोठ्या प्रमाणात शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे, अशा चर्चा सुरू आहेत. यावरच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत वक्फ बोर्डाने राष्ट्रीयत्व दाखवून जमिनीवरचा मालकी हक्क सोडावा, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
राज ठाकरे यांनी या संदर्भातील पोस्ट एक्स या प्लॅटफॉर्मवर केली आहे. ‘प्रश्न हा या जमिनीपुरता नाही. तर वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ? हा आहे. काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने मांडलं होतं. त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको’, या शब्दात राज ठाकरे यांनी वक्फ बोर्डासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेवरही टीका केली.
वक्फ बोर्डाने जमिनी परत द्याव्या
याच पोस्टमध्ये राज ठाकरे पुढे म्हणतात, ‘मला आज देशातील एकूणच वक्फ बोर्डांना एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे, ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी ‘भूदान चळवळ’ सुरु केली. ज्यामध्ये लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती. जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा. सतत कुठे, ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगण्यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं.’
वक्फ बोर्डाचं स्पष्टीकरण
वक्फ बोर्डाने दावा केला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य वक्फ बोर्डानेही यासंदर्भातली माहिती घेतली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी सांगितलं, ‘एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्यूनलमध्ये दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवले आहेत. त्या नोटीस वक्फ बोर्डाने बजावलेल्या नाहीत. त्याचबरोबर आम्ही लातूर मधील कोणत्याही गावावर दावा सांगितलेला नाही.’ असं स्पष्टीकरण समीर काजी यांनी दिलं.