मुंबई : निवडणुकांमध्ये वारंवार पराभव मिळत असल्याने राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही सायंकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत तब्बल ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी जगभरात फिरून भारताची बदनामी करीत आहेत. मात्र, या कृतीतून त्यांची मते वाढणार नाहीत. त्यासाठी जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात ते हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. आता मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप ते करत आहेत. अतिशय बाळबोध प्रकारचा हा आरोप आहे. भारताची बदनामी बंद करून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन करावा, असा सल्ला फडणवीस यांनी त्यांना दिला.
कोणताही देशभक्त परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करीत नाही. राहुल गांधी ज्याप्रकारे वर्तन करीत आहेत, त्यातून त्यांच्या चारित्र्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जगात जाऊन कितीही बदनामी केली तरी त्यातून निवडणूक जिंकता येणार नाही. उलट बदनामीतून त्यांचीच उंची कमी होत जाईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.